मोठी पदे मिळूनही विकास कामे करता येईना : रणजितसिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:59+5:302021-03-23T04:41:59+5:30
फलटण : ‘विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना मोठी पदे मिळूनही तालुक्यात भरीव काम करता आले नाही. हक्काचे पाणी ...

मोठी पदे मिळूनही विकास कामे करता येईना : रणजितसिंह
फलटण : ‘विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना मोठी पदे मिळूनही तालुक्यात भरीव काम करता आले नाही. हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. वयाचे भान राखून मी गप्प आहे, अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ अशी टीका खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली.
नुकताच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधक विकास कामात अडथळा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोकराव जाधव, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते उपस्थित होते.
रणजितसिंह म्हणाले, ‘मी खासदार झाल्यावर एका महिन्यात बारामतीकरांनी पळवून नेलेले नीरा देवघरचे पाणी पुन्हा फलटण, माळशिरस तालुक्यांकडे वळविले होते. फलटण-लोणंद रेल्वे सुरू केली होती. नीरा देवघर कालव्यासाठी तरतूद करतानाच नाईकबोमवाडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर केली होती. सर्व कामांना खोडा घालण्याचे काम रामराजे यांनी केले. त्यांचे सरकार पुन्हा येताच बारामतीकरांनी नीरा-देवघर पाणी पुन्हा पळविले. यावर चकार शब्द काढायला रामराजे तयार नाहीत.’
रणजितसिंह म्हणाले, ‘माझा स्वराज साखर कारखाना चांगला चालला असून पुढील वर्षी तो पंधरा हजार मेट्रिक टन गाळप करणार आहे. खंडाळा तालुक्यात आंदोरी येथे मोठा प्रोसेसिंग कारखाना सुरू करीत असून आम्ही श्रीराम व साखरवाडी कारखान्यात कधी राजकारण आणले नाही. मात्र आमच्या कारखान्याला अडचणीत आणण्याचा रामराजे यांनी सतत प्रयत्न केला आहे. साखरवाडी कारखाना कवडीमोल किमतीने दत्त इंडिया कंपनीला रामराजेंनी देताना त्यामध्ये स्वतःची पार्टनरशिप घेतली. ऊस उत्पादकांचे थकीत २६ कोटी रुपये दिले नाही तर साखरवाडी कारखान्याकडे मला माझ्या पद्धतीने लक्ष द्यावे लागेल.
चौकट
*चौकट**
फलटण ते पुणे रेल्वेचा ३० मार्चला प्रारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने मंगळवार, दि. ३० मार्च रोजी फलटण–पुणे रेल्वे सेवेचा प्रारंभ रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते होत आहे. पाण्यासाठी संघर्ष केला म्हणून बारामतीला जाणारे ६५ टक्के पाणी आता फलटणला मिळत आहे. रेल्वे, निरा–देवधर, नाईकबोंबवाडी एमआयडीसी, रस्ते आदी विकासकामांबरोबरच तालुक्यासाठी एका वर्षात ७६ कोटींचा निधी आणलेला आहे. आगामी काळात फलटणचे विमानतळ विमान सुविधेसाठी कार्यरत करणार असल्याचेही खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.