राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करा
By Admin | Updated: January 15, 2015 23:29 IST2015-01-15T22:23:35+5:302015-01-15T23:29:11+5:30
देवेंद्र फडणवीस : भाजपच्या पराभूत उमेदवारांना केले रिचार्ज; जिल्ह्यातील चौघे बैठकीला

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करा
सातारा : ‘आगामी पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करा. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील कोणतीही विकास कामे आणल्यास प्राधान्याने सोडविले जातील. पण राष्ट्रवादीचा बालेकिल्ला उद्धवस्त करा,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.विधानसभा निवडणुकीत अपयशी ठरलेल्या ‘भाजप’ उमेदवारांची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला राज्यभरातून सुमारे ११० उमेदवार उपस्थित होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातून दिपक पवार, पुरुषोत्तम जाधव, अतूल भोसले व महाडीक उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या विविध भागातून आलेल्या विधानसभा उमेदवारांशी चर्चा केली. यामध्ये कोणत्या भागात कमी पडलो. कमी पडण्याची कारणे त्यांनी जाणून घेतले. तसेच पुढील निवडणुकांसाठी त्यांनी कानमंत्रही दिला. फडणवीस म्हणाले, ‘गत निवडणुकीत काही कारणांनी कमी पडलो असलो तरी चिंता करण्याचे कारण नाही. पण आगामी पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी कामाला लागावे. त्यासाठी आपापल्या भागात सभासद नोंदणी वाढवून पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील कामे घेऊन आल्यास ते प्राधान्याने केली जातील.’ (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकीमुळे प्रत्येकाला नवसंजीवनी मिळाली आहे. आगामी पाच वर्षे डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामाला सुरूवात करणार आहोत. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा घटक असलेल्या ऊस उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- दीपक पवार