भगव्या डाळिंबांच्या रोपांना परराज्यात मागणी
By Admin | Updated: April 17, 2016 23:33 IST2016-04-17T21:31:47+5:302016-04-17T23:33:35+5:30
दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयार

भगव्या डाळिंबांच्या रोपांना परराज्यात मागणी
दशरथ भोसलेंचा प्रयोग : घाडगेवाडीत शेततळ्यावर सायफनपद्धतीने रोपवाटिका तयार
फलटण तालुक्याचा पश्चिम भाग दुष्काळी म्हणून कायमच ओळखला जातो; मात्र येथील काही शेतकरी असेही आहेत की, जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करून आदर्श शेती करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यापैकी एकच असलेले घाडगेवाडीतील दशरथ मारुती भोसले यांनी शेततळ्यांवर सायफनपद्धतीने भगवा डाळिंबांची रोपवाटिका तयार केली आहे. या रोपांना राज्याबाहेरून मागणी वाढत आहे.
घाडगेवाडी हे पूर्ण दुष्काळी गाव होते. त्यावेळी १९८० मध्ये वडिलोपार्जित तीन-चार ठिकाणची जमीन विकून मुळीकवाडी गावच्या हद्दीत मारुती भोसले यांनी दहा एकर जमीन खरेदी केली. त्याचे सपाटीकरण करून त्यामध्ये विहीर खोदली; पण पाणी कमी असल्याने त्यांनी आंबा, डाळिंब आदी फळबाग घेतली.
त्यांचा मुलगा दशरथ याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर शेतीमध्ये लक्ष घातले आहे. त्यांनी डाळिंबांच्या झाडापासून कलमे तयार करून त्याची रोपे तयार करण्यास सुरुवात केली. तीन एकर डाळिंबाची लागवड केली. बाकीच्या शेतात ऊस, सीताफळ, डाळिंब, आंबा, मका आदी पिके घेतली आहेत. २००४ मध्ये दुष्काळामुळे पाणी कमी पडू लागले. त्यामुळे टँकर खरेदी करून टँकरने पाणी घालून त्यांनी बाग जगवली.
त्यानंतर दशरथ भोसले यांनी डाळिंबाची रोपे तयार करून विक्रीस ठेवले. त्यांनी खात्रीलायक रोपे तयार केल्याने रोपवाटिकेस शासनमान्यता मिळाली. त्यांची डाळिंबाच्या रोपांना महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या आंध्र आणि कर्नाटक राज्यांतून मागणी होत आहे.
कृषी खात्यामार्फत राष्ट्रीय फलोत्पादन कार्यक्रमांतर्गत १३० बाय १३० लांबी रुंदी व सतरा फूट उंचीचे शेततळे काढून ७० ते ८० लिटर क्षमतेचा पाणीसाठा झाला आहे. या शेततळ्यातून सायफनपद्धतीने पिकांना त्यांनी पाणी देण्याचा प्रयत्न केला आहे. बारा एकर क्षेत्र ठिबक पद्धतीने ओलिताखाली आणले आहे. त्यांनी चांगल्या प्रतीची रोपे पुरवून रोगमुक्त बागेमुळे त्यांना केंद्रीय कृषी खात्याने प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. पॉलिहाउसमध्ये दरवर्षी ८० ते ९० हजार रोपे तयार केली जातात.
पाणी उसने मिळत नाही
फलटण दुष्काळी भागात पाणी म्हणजे जीवन आहे. पाण्याचे मोल आम्हा दुष्काळी शेतकऱ्यांनाच ठाऊक. आहे पाणी म्हणून वारेमाप उधळपट्टी करुन चालणार नाही. पैसे उसने वेळेत मिळतात; पण पाणी मिळत नाही. म्हणून पावसाळ्याचे पाणी जपून वापरत असतो. पावसाचे पाणी साठवून ठेवतो. त्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने पाणी ठिबकमुळे पुरते. हाच प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांनीही राबवावा. शेतीला जोडधंदा म्हणून रोपवाटिका तयार करून आर्थिक प्रगती साधली आहे. असा अनुभव दशरथ भोसले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितला.