कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:51 IST2021-06-16T04:51:44+5:302021-06-16T04:51:44+5:30
कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला अद्याप सूर गवसला नसून तुरळक सरी वगळता पावसाची उघडीप दिली आहे. १ ...

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी
कोयनानगर : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाला अद्याप सूर गवसला नसून तुरळक सरी वगळता पावसाची उघडीप दिली आहे. १ जूनपासून सुरू झालेल्या नवीन तांत्रिक वर्षातील पंधरा दिवसांत केवळ २.०६४३ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. तर सिंचन व वीजनिर्मिती बाष्पीभवनाने २.८५ टीएमसी पाणी खर्ची झाले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात काहीशी घट झाली आहे.
कोयना धरणात सध्या ३,७५२ क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. पश्चिमेला वीजनिर्मितीस २.२७ टीएमसी, पूर्वेला सिंचनसाठी ०.४०७ टीएमसी व बाष्पीभवन, गळती यामुळे २.८५ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे, तर धरणाच्या पाणीसाठ्यात ०.७८ टीएमसीने घट झाली आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत पावसाचा जोर कमी आहे. गेल्या वर्षी १५ जून रोजी पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमापकावर पावसाची नोंद कोयनानगर येथे ३३५, नवजा येथे ३१९ तर महाबळेश्वरला ४३९ मिलिमीटर इतकी होती. या वर्षी मात्र कोयना येथे १३९, नवजा येथे २१० तर महाबळेश्वर येथे ३२३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता २८.४९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तो गेल्या वर्षी ३२.२७ टीएमसी होता. सातारा, सांगली जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सिंचनासाठीचा पायथा वीजगृहातून सोडण्यात येणारे पाणीही ५ जूनपासून बंद करण्यात आले आहे. चोवीस तासांत कोयना येथे १३, नवजा ३ तर महाबळेश्वर येथे १५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.