कोयनेवर ओढावणार भीषण पाणी संकट
By Admin | Updated: November 25, 2015 00:42 IST2015-11-24T23:51:02+5:302015-11-25T00:42:43+5:30
नियोजनाचा अभाव : जिल्ह्यावरील पाणी टंचाई निवारणासाठी उपायांची मागणी

कोयनेवर ओढावणार भीषण पाणी संकट
पाटण : कोयना धरणात आजमितीस १०५.२५ टीएमसी पैकी केवळ ६९.५५ टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध असल्याने जिल्ह्यासह महाराष्ट्रावर पाणी टंचाईच्या संकटाचे चिन्हे दिसू लागली आहेत. दुसरीकडे वीजनिर्मितीसाठी कोयना धरणातील पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आणि कोयना धरण भरले नाही म्हणून कोयना धरण व्यवस्थापनाने नवीन नियोजन केलेल्या आराखड्याकडे पाहावयास मंत्री स्तरावर वेळ नसल्याने कसलेही नियोजन नाही. त्यामुळे आगामी एप्रिल, मे, जून हे तीन महिने कसे जाणार यांची चिंता जनतेमधुन व्यक्त होत आहे.
कोयणा धरणातील ६७.५० टीएमसी पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी आणि ३० टीएमसी पर्यंतचा पाणीसाठा शेती व सिंचनासाठी वापरावयाचा असा वार्षीक करार आहे. त्यात आता बदल करावयाचा असे प्रयत्न सुरू झाल्याचे यासंदर्भात सांगली येथे कोयना धरण व्यवस्थापनाचे मुख्य अभियंता अधीक्षक आणि कार्यकारी अभियंता यांची बैठक झाली.
त्यांनी तयार केलेल्या नियोजनाचा आराखडा मंत्रालय स्तरावर पाठविला आहे. त्याचे अद्याप निर्णय बाहेर आलेले नाहीत. तर दुसरीकडे कोयना धरणातील पाणीसाठ्याचा वापर प्रतिदिन एक टीएमसीने सुरू आहे. जूनपर्यंत धरणातील पाणीसाठा कसा पुरवायचा याची चिंता जलसंपदा विभाग व धरण व्यवस्थापनास दिसत नाही. त्यामुळे आगामी सहा महिने पर्यंत कोयना धरणात खडखडाट होणार की पाण्याचे योग्य नियोजन होणार याविषयी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)
कोयना धरणात यावर्षी पूर्ण पाणीसाठा झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे धरण भरले नाही. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नव्याने नियोजन करण्याचे ठरले. त्याचा प्रस्ताव मंत्रीस्तरावर पाठविला आहे. त्याचा निर्णय अद्याप समजलेला नाही. तो पर्यंत जुन्याच पाणीवाटपाची अंमलबजावणी सुरू आहे.
-ज्ञानेश्वर बागडे, कार्यकारी अभियंता, कोयना धरण व्यवस्थापन