कऱ्हाडात रहिवाशांच्या डोक्यावर ‘धोक्याची’ घंटा!

By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T22:50:34+5:302016-06-15T00:03:19+5:30

धोकादायक इमारती सर्व्हे : पालिका प्रशासनाकडून धोकादायक इमारतींकडे दुर्लक्ष; वर्षानुवर्षे नुसत्या नोटिसाच, यावर्षीचा सर्व्हे कधी ?

'Danger' hour on the head of residents of Karhad! | कऱ्हाडात रहिवाशांच्या डोक्यावर ‘धोक्याची’ घंटा!

कऱ्हाडात रहिवाशांच्या डोक्यावर ‘धोक्याची’ घंटा!

कऱ्हाड : शहरात आजही काही ठिकाणी अनेक वर्षांपासून धोकादायक इमारतींमध्ये लोक आपला जीव मुठीत धरून वास्तव्य करीत आहेत. पावसाळा जवळ आला की, जीर्ण झालेल्या व तडे गेलेल्या इमारती ढासळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा इमारतींचा सर्व्हे करून त्या उतरवून घेणे महत्त्वाचे असते. मात्र, अशा इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून अद्यापही करण्यात आलेला नसल्याने त्या इमारती सध्या धोकादायक स्थितीत उभ्या आहेत.शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे पालिकेकडून दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की केला जातो. त्यानुसार २०१३ मध्ये पालिकेने जेव्हा सर्व्हे केला तेव्हा ५३ धोकादायक इमारती आढळून आल्या. त्यावेळी संबंधितांना नुसत्या नोटिसा देण्यात आल्या. त्यानंतर २०१५ मध्ये पालिकेने केलेल्या सर्व्हेतून ४४ धोकादायक इमारती आढळून आल्या आहेत. त्यातील काहींना नोटिसा देण्यात आल्या तर काही पाडण्यात आल्या. मात्र, यावर्षीचा जून महिना अर्ध्यावर आला तरी धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्यात आलेला नाही. किंवा त्या अनुषंगाने काहीच उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.
पावसाळ्यामध्ये धोकादायक, भेगा पडलेल्या इमारती कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारतींचे सर्र्वेक्षण करणे गरजेचे असते.
पालिकेतील पेठशाखा अभियंत्याकडून इमारती उतरविण्याबाबत इमारत मालकांना अद्याप नोटिसाही देण्यात आलेल्या नसून सर्व्हे देखील करण्यात आलेला नाही. त्यामुळे या धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शहरातील धोकादायक इमारतींच्या समस्यांबरोबर अनधिकृत बांधकामे, जागेचे अतिक्रमण, पालिकेचे नियम डावलून बांधण्यात आलेल्या इमारती अशा अनेक समस्या आहेत. त्यावर वेळीच उपाययोजनेची गरज आहे. (प्रतिनिधी)

धोकादायक इमारती म्हणजे...
पालिकेकडून ठरविण्यात आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये ४० ते ५० वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या व जीर्ण झालेल्या इमारत, तिच्या भिंतीला तडे गेले असल्यास, इमारतींच्या लाकडांना वाळवी लागली असल्यास, पांढऱ्या मातीपासून व बारीक दगडापासून बांधण्यात आलेली कौलारू घरे, वाडे यांचा समावेश धोकादायक इमारतींमध्ये केला जातो.


आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून दुर्लक्ष !
कऱ्हाड शहरात पावसाच्या अनुषंगाने पालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या कक्षातर्फे शहरात पावसाळ्यात आपत्ती स्थितीत उपाययोजना आखल्या जाणार आहे. मात्र, या आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून अद्याप शहरातील धोकादायक इमारतींकडे लक्ष दिले गेलेले नाही.

Web Title: 'Danger' hour on the head of residents of Karhad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.