कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची आज वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST2021-03-22T04:35:40+5:302021-03-22T04:35:40+5:30
सातारा : गतवर्षी २३ मार्चला सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आज ...

कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची आज वर्षपूर्ती
सातारा : गतवर्षी २३ मार्चला सातारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. आज या घटनेला बरोबर एक वर्ष होत असून, त्यावेळी जिल्हा प्रशासनाने नेमकी कशी तयारी केली होती हे आजही अनेकांच्या डोळ्यांसमोरून तरळून जाते.
जगभरात कोरोनाने हाहाकार माजविल्यानंतर गतवर्षी २३ मार्चला साताऱ्यातही पहिला रुग्ण आढळून आला होता. दुबईवरून आलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली होती. संबंधित महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलीनीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आले होते. या महिलेच्या देखरेखीसाठी विशेष म्हणजे तब्बल सहा पथके तैनात करण्यात आली होती. पहिलाच रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते. नेमका कसा उपाय करायचा यावर जिल्हा प्रशासनाच्या बैठका सुरू होत्या. संबंधित महिलेच्या संपर्कात साताऱ्यातील कोणत्या व्यक्ती आल्या याची प्रशासनाकडून तातडीने माहिती घेण्यात आली. एवढेच नव्हे, तर खेड परिसर सील करण्यात आला. त्या परिसरातील रस्तेही अडविण्यात आले. इतकी प्रचंड खबरदारी जिल्हा प्रशासनाने घेतली होती. कोरोना हा परदेशातून भारतात प्रवेश केल्यामुळे नागरिकांमध्ये अगोदरच भीती होती. त्यातच साताऱ्यातही सापडलेला पहिला रुग्ण दुबईहून आला होता. त्यामुळे नागरिक आणखीनच अस्वस्थ झाले होते. या महिलेच्या अहवालानंतर दोन दिवसांत तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. हळूहळू एकाचे दोन अशी रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणारे रस्ते पूर्णपणे बंद केले. त्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळत होता. सुरुवातीला कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने टम फ्ल्यूच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात होत्या, तर दुसरीकडे कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून प्रचंड खबरदारी घेतली जात होती. रस्त्यावर कोणालाही फिरकू दिले जात नव्हते. तोंडाला मास्क न लावणाऱ्यावर प्रसंगी पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. केवळ कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाकडून प्रयत्न केले गेले. मात्र, त्यानंतरही वर्षभर कोरोनाची रुग्ण संख्या मात्र कमी झाली नाही.