कोणत्याही कुटुंबाचा कर्ता उपचाराविना कोरोनाने हिरावू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:04+5:302021-06-23T04:25:04+5:30
वाई : ‘तरुणांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे, पण दुर्दैवाने कोरोनोची दुसऱ्या लाटेच्या महामारीत तरुणांसह घरातील कर्ता पुरुष ...

कोणत्याही कुटुंबाचा कर्ता उपचाराविना कोरोनाने हिरावू नये
वाई : ‘तरुणांची शक्ती ही आपल्या देशाची ताकत आहे, पण दुर्दैवाने कोरोनोची दुसऱ्या लाटेच्या महामारीत तरुणांसह घरातील कर्ता पुरुष गेल्याने आख्खे कुटुंब आधारहीन झाले आहे. तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीलाच वाई मतदारसंघात सहाशे बेड उपलब्ध करण्यात येणार आहेत, त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने विलगीकरण कक्ष स्थापन करणे गरजेचे आहे. यापुढे कोणत्याही कुटुंबातील उपचाराविना कुटुंबाचा कर्ता व्यक्ती जाता कामा नये,’ असे भावनिक उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.
खानापूर ता. वाई येथील विलगीकरण कक्षाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप, महादेव मस्कर, सरपंच पूजा जाधव, माजी सरपंच किरण काळोखे, सदस्य अशोकराव जाधव, प्रकाश जाधव, पूजा जाधव, अर्चना जाधव, अर्चना भोसले, अनिता पवार, दिलीप मंडले, सोपान जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘गावात कोरोनोचा शिरकाव होऊ नये याची काळजी गावातील सरपंच सर्व सदस्यांसह गाव कारभाऱ्यांबरोबर ग्रामस्थांनी घ्यावी. शासनाच्या आदेशांचे पालन करून गावोगावी विलगीकरण कक्ष तयार करुन त्या ठिकाणी रुग्णांना दाखल करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने स्वीकारली पाहिजे. माणसाने कितीही प्रगती केली तरी निसर्ग काय करु शकतो. हे गेली पंधरा महिने अनुभवतो आहे. खानापूर या गावातील कर्तीधर्ती चांगली माणसे गेली याचे दुःख आहे. पहिल्या लाटेचा वाईट अनुभव घेऊन आपण आत्ता दुसऱ्या लाटेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. सध्या तालुक्यात रुग्णसंख्या कमी आहे. याआधी फारच रुग्ण होते. त्या वेळी गावे लॉक करून रुग्णसंख्या आटोक्यात आणली, पण दुसऱ्या लाटेवेळी आपण सगळेच गाफील राहिलो. प्रशासनाने घालून दिलेले नियम प्रत्येकाने झुगारून टाकले होम आयसोलेशन पध्दतीने आपला घात झाल्याने रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे वयोवृद्धांपेक्षा तरुणांचा मृत्यूचा आकडा वाढला.’
चौकट
रुग्ण नसला तरी गाफीलपणा नको...
सध्या गावात रुग्ण नसला तरी गाफील राहू नका. येणाऱ्या तिसऱ्या लाटेची काळजी घ्यावी लागेल. उद्यापासून वाईची बाजारपेठ सुरु होणार आहे. तेथे होणारी गर्दी ही कोरोनोला आमंत्रण देणार आहे हे नक्कीच. दोन महिन्यांनंतर येणारी तिसरी लाट ही लहान मुलांवर येणार आहे. त्याला ही आपण सर्वांना सामोरे जावे लागणार आहे. येथील ग्रामस्थांना उपकेंद्र हवे आहे त्याचा गांभीर्याने विचार केला जाईल,’ असेही मकरंद पाटील यांनी सांगितले.
फोटो २२वाई-खानापूर
खानापूर येथील विलगीकरण कक्षाचे उद्घाटन आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच पूजा जाधव, अनिल जगताप उपस्थित होते. (छाया : पांडुरंग भिलारे)