कऱ्हाड तालुक्यात ढगाळ वातावरण; पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:56+5:302021-06-17T04:26:56+5:30
ढगाळ वातावरणामुळे पाले भाज्यांच्या पिकांवर किडीचा प्रादूर्भाव रानं तयार पण पावसाचाच पत्ता नाही लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : ...

कऱ्हाड तालुक्यात ढगाळ वातावरण; पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव
ढगाळ वातावरणामुळे पाले भाज्यांच्या पिकांवर किडीचा प्रादूर्भाव
रानं तयार पण पावसाचाच पत्ता नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : कऱ्हाड तालुक्यात शेतकऱ्याने पेरणीसाठी मशागत करून राने तयार केली असली तरी अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे बळीराजाला पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होत असल्यामुळे पालेभाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील शेतकरी मे महिन्यापूर्वीच शेतातील मशागतीची कामे पूर्ण करतात. अशाच पद्धतीने या वर्षीही मशागतीची कामे लवकर आटोपून शेतकरी पेरणीसाठी तयार झाले होते. त्यातच तालुक्यात पुणे-बंगळूर महामार्गामुळे शेतीची दोन भागांत विभागणी होते. महामार्गाच्या पूर्वेकडील भागात बागायती शेती करण्याची पध्दत वेगळी आहे, तर पश्चिमेकडील भागात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे या भागातील शेती करण्याची पद्धत वेगळी आहे. पश्चिमेकडील भागात परंपरागत शेती पद्धतीनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धात धूळवाफेवरच पेरण्या करण्याची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाचा अनियमितपणा विचारात घेता पारंपरिक पद्धतीने शेती करणे अवघड झाले आहे. असे असतानाही आजही काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने धूळवाफेवरच पेरणी करतात. अशा पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागते. बहुतांशी शेतकरी समाधानकारक पाऊस झाल्यावरच पेरणी करतात.
पूर्वेकडील भागात बागायती शेती असल्यामुळे सरी सोडून टोकणी पध्दतीने शेती करण्याची परंपरा आहे. बागायती शेतीत शेतकरी अंतर्गत पिके टोकण पद्धतीने करतात. ऊस लागणही शेताला पाणी पाजून केली जाते. मात्र, अंतर्गत पीक टोकणी ही पावसाच्या ओलीवरच करण्यात येते. त्यानुसार शेतकऱ्यांची मशागतीची कामे मे महिन्यातच पूर्ण झाली आहेत. मात्र, पावसाळा सुरू होऊन १० दिवस उलटले तरी पावसाने दडी मारली असल्यामुळे पूर्वेकडील भागात सरी सोडून शेतकरी टोकणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहे. तर पश्चिमेकडील धूळवाफेवर पेरणी केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत.
तालुक्यातील मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले ही वेलवर्गीय भाज्याही घेतल्या जातात. भेंडी, गवारी, घेवडा यासारख्या शेंगवर्गीय भाज्यांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही सध्या या परिसरात वाढली आहे. त्यातच दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे पालेभाज्यांवर किडीचा प्रादर्भाव वाढला आहे.