कृषी सीमकार्डधारकांची फसवणूक
By Admin | Updated: December 5, 2015 00:18 IST2015-12-04T22:16:40+5:302015-12-05T00:18:32+5:30
‘बीएसएनएल’चा झटका : सुविधा कमी केल्याने बिलात तिपटीने वाढ

कृषी सीमकार्डधारकांची फसवणूक
वाई : बीएसएनएलने पाच वर्षांपूर्वी खास शेतकऱ्यांसाठी अनेक सुविधा असणारी कृषीकार्डची योजना जाहीर केली होती़ या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी परवडतील, अशा अनेक सुविधा होत्या. अलीकडे या कार्डधारकांना मोठ्या रकमेची बिले येऊ लागल्यामुळे शेतकरी हादरला आहे.कृषीकार्ड योजनेत कार्ड ते कार्ड अमर्याद मोफत सेवा, लँडलाईन व एसटीडी कॉलिंगसाठी सुविधा, १ जीबी इंटरनेट सेवा मोफत, इतर कंपन्यांच्या कार्डला २०० कॉल मोफत, तसेच ३० पैसे प्रतिकॉल चार्जेस आकरण्यात येत होते़ अशा अनेक सुविधा होत्या़ पोस्टपेड व प्रीपेडसाठी वेगवेगळ्या अनेक सुविधा होत्या़ अशा लोकप्रिय सुविधामुळेच अनेक शेतकऱ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्यअ प्रमाणात कृषी कार्डधारक झाले़ अनेक वर्षांपासून ही सुविधा सुरळीत चालली होती़ त्यांमुळे कृषी कार्डधारकांची संख्या खूप मोठी आहे़ कृषी कार्डधारकांची मोठी संख्या असताना आॅक्टोबर महिन्यात बीएसएनएलने एकाएकी सुविधा कमी करून भरमसाठ दरवाढ केल्याने सर्व सामान्य कृषी कार्ड शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे़ ही त्यांची फसवणूक आहे. कार्डधारकांच्या बिलात तिपटीने वाढ झाल्याने कार्डधारकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, बीएसएनएलने त्वरित भाववाढ कमी न केल्यास कार्डधारक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़ अनेक ग्राहक बीएसएनएलची कार्ड बंद करून खासगी कंपन्याकडे वळण्याच्या विचारात आहेत. काही कार्डधारकांनी न्यायालयात तसेच ग्राहक मंचात जाण्याच्या तयारीत आहेत़ (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा विश्वासघात केला--बीएसएनएलने कृषीकार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा काढल्याने अनेक लोकांनी कृषीकार्ड घेतली; परंतु एकाएक सुविधा कमी करून बीएसएनएलने विश्वासघात केला आहे़ ही दरवाढ त्वरित मागे घेऊन शेतकऱ्यांना बीएसएनएलने दिलासा द्यावा; अन्यथा बीएसएनएलविरोधात आंदोलन उभारण्यात येईल
- पी़ एस़ पाटील, कार्डधारक
बीएसएनएलने दिलेल्या चांगल्या सुविधामुळे अनेक लोकांनी हा प्लॅन घेतला होता; पण अशा प्रकारे सुविधा कमी केल्याने बिले तिपटीने वाढली आहेत, तेव्हा आम्ही कार्ड बंद करण्याच्या मानसिकतेत आहे़
- मिलिंद गाढवे, कार्डधारक