ग्रामीण भागात बैलजोडी झाली दुर्मीळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:40 IST2021-03-23T04:40:59+5:302021-03-23T04:40:59+5:30
सणबूर : खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बैल पाळणे बंद केले आहे. त्याचा फटका शेतीकामांना बसत आहे. बैल असणाऱ्या ...

ग्रामीण भागात बैलजोडी झाली दुर्मीळ
सणबूर : खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बैल पाळणे बंद केले आहे. त्याचा फटका शेतीकामांना बसत आहे. बैल असणाऱ्या शेतकऱ्याला भाडे देऊन शेतीच्या मशागतीची कामे करून घेण्याची वेळ अनेक शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच शेतीत यांत्रिकीकरण झाल्याचे दिसून येत आहे.
ढेबेवाडी विभागात पूर्वी अपवाद वगळता प्रत्येक शेतकऱ्याकडे बैल होते. त्यावेळी गावातील शेतकरी पैरा करून शेतीची कामे ठरवून करायचे. मात्र, कालांतराने शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढला. बैल पाळण्याचा खर्चही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने हळूहळू शेतकऱ्यांनी बैल पाळणे बंद केले. सध्या विभागातील काही शेतकरी मशागत आणि पेरणीपुरतेच बैल घेत असल्याचे दिसत आहे. मानेगाव येथील जनावरांचा आठवडा बाजार बंद झाल्याने बैलांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प झाले आहेत. बैलापेक्षा एखादी म्हैस पाळली तर दुधावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो, अशी शेतकऱ्यांची भावना झाली आहे.
पूर्वी गावातील व शेजारील गावातील बैल पाळणारे शेतकरी एकत्र येत पैरा करून स्वत:बरोबरच इतर शेतकऱ्यांच्या शेतीची मशागत व पेरणीची कामे करत होते. मात्र, सध्या ठराविकच गावांमध्ये असे चित्र दिसून येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे हे सर्व बंद होत चालले आहे. त्यातच ट्रॅक्टरची भर पडल्याने बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
- चौकट
शेतमजूरही मिळेनात!
बैलांची संख्या मोठ्या प्रमाणात घटल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. शेतीची मशागत, पेरणी करण्यासाठी शेतमजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यातच प्रत्येकवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे शेती करणे परवडत नाही. शिवाय बैल पाळणेही अवघड झाल्याचे दिसून येत आहे.
- कोट
ढेबेवाडी विभागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या परिसरातील डोंगरांना वणवे लावले जात असल्याने तेथील वन संपत्तीचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे जनावरांच्या ओल्या व सुक्या चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
- सुभाष पाटील
शेतकरी, मंद्रुळकोळे