हा तर बिल्डरनिर्मित महापूर!

By Admin | Updated: August 22, 2014 00:49 IST2014-08-21T21:07:24+5:302014-08-22T00:49:57+5:30

जनजीवन अस्ताव्यस्त : इंच-इंच जमिनीसाठी ‘ओढा’ताण; नैसर्गिक प्रवाह वळविल्यानेच जलतांडव

This builder-built magnum opus! | हा तर बिल्डरनिर्मित महापूर!

हा तर बिल्डरनिर्मित महापूर!

राजीव मुळ्ये - सातारा --कुणी घरातून पाणी बाहेर काढतो आहे, तर कुणी दुकानातून चिखल साफ करतो आहे. कुणाचं फर्निचर पाण्यानं फुगलंय, तर कुणाला प्रवाहाबरोबर वाहून गेलेल्या चीजवस्तू मोडलेल्या-तुटलेल्या स्थितीत उघड्या डोळ्यांनी पाहाव्या लागतायत. साताऱ्यात बुधवारी तासभर झालेल्या जलतांडवानंतर गुरुवारचा दिवस एकच यक्षप्रश्न घेऊनच उगवला. हा बिल्डरनिर्मित महापूर पुन्हा आला तर...?
होय, ‘बिल्डरनिर्मित’च! पाऊण तासात ८२ मिलीमीटर पाऊस शहराळलेल्या नागरिकांसाठी नवा असेल; पण निसर्गासाठी तो नवा नाही. जुन्या काळातल्या सातारकरांना विचाराल तर त्यांनाही तो सवयीचाच! बुधवारी कुठेही जीवितहानी झाली नाही हे सुदैव; पण वित्तहानीनं हाहाकार उडालाय. जागोजागी कमरेपेक्षा जास्त पाणी साचलंच कसं? ते वाहून का गेलं नाही? या प्रश्नांची उत्तरं नगरपालिका आणि इंच-इंच जमिनीसाठी ‘ओढा’ताण करणाऱ्या बिल्डरांनी तसेच नागरिकांनी प्रामाणिकपणे शोधली नाहीत, तर हे जलतांडव वारंवार पाहायला मिळेल, असे स्पष्ट संकेत ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीतून मिळत आहेत.
डोंगरउतारावर वसलेल्या या शहरात नगरविकास विभागाने जी दक्षता घ्यायला पाहिजे, बांधकामांवर जी बारीक नजर ठेवली पाहिजे, तिच्या अभावामुळंच या संकटाला आमंत्रण मिळालंय. डोंगरावरून वाहत येणारे बहुसंख्य ओढे शहरातून प्रवास करतात. या ओढ्यांची रुंदी कमी होत-होत आता त्यांची अरुंद गटारं झाली आहेत. ८२ मिलीमीटर पाऊस या ओढ्यांना झेपला नाही आणि पाणी इतस्तत: पसरत गेलं. सखल भागात साचून राहिलं. जिथं अजिबात पाणी येण्याची शक्यता नव्हती, तिथं धो-धो पाणी वाहिलं; तुंबून राहिलं. वाहनं बुडाली; वाहून गेली. काही ठिकाणी माणसं कमरेइतक्या पाण्यात अडकून बसली. काही घरांत मागल्या दारानं पाण्याचा लोंढा शिरला आणि घरातल्या चीजवस्तू घेऊन पुढच्या दारातून पाणी बाहेर पडलं. एके ठिकाणी तर लोंढ्यामुळं पोलादी शटर वाकलं. हे सगळे अनर्थ मानवी चुकांमुळंच झाल्याचं आढळून आलंय.
ओढे झालेत गटारांपेक्षाही अरुंद!
शहरात अनेक ठिकाणी नैसर्गिक उतारांवरून वाहत येणा़रे ओढे बांधकामांमुळं गटारांपेक्षाही अरुंद बनले आहेत. सातारकरांच्या पूर्वजांनी अत्यंत बुद्धिचातुर्यानं ओढ्यांची पात्रं रुंद ठेवली. काही ओढ्यांवर ब्रिटिशकालीन पूलही आढळतात. परंतु पुलाखालून प्रवास करणारा ओढा मात्र ‘गुप्त’ झालाय. शहराचा आकार एखाद्या तबकासारखा असून, डोंगरावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून येतं. अनेक ठिकाणी या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळवून जलवाहिनीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न झालाय. सहा फूट रुंदीचे ओढे अनेक ठिकाणी दोन ते तीन फुटांवर आलेत. काही ठिकाणी भिंती बांधून, जलवाहिन्यांमधून ओढे जातात. नैसर्गिक उतार ज्या दिशेला असेल, त्या दिशेनं पाणी वाहणारच; परंतु उतार विचारात न घेता केवळ ‘सोय’ विचारात घेऊन प्रवाह वळविले आहेत. बुधवारच्या पावसात या प्रवाहांनी वळण घेण्यास विरोध केला आणि ते रस्त्यावर आले. विशेषत: गोडोली भागात आणि अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सर्व पेठांमध्ये ही परिस्थिती पाहायला मिळाली. अनेक ठिकाणी ओढ्यातच कॉलम उभे करण्यात आले आहेत. ओढ्याची नैसर्गिक रुंदी दर्शविणारे नकाशेच उपलब्ध नसल्यामुळे ओढ्यालगत बांधकाम करणारे ‘आपलीच जमीन’ समजून आत-आत घुसले आहेत. काही ठिकाणी मधूनच ‘गुप्त’ झालेले ओढे काही अंतरावर पुन्हा प्रकटले आहेत. काही ठिकाणी ओढ्यांवर पुलासारखी स्लॅब टाकून त्यावर इमारती बांधल्याचे दिसून आले आहे. डोंगरावरून वाहून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास तो या ‘पुला’खालून जाऊ शकत नाही आणि रस्त्यावर पसरतो. नगररचना विभागाचे यावर काही नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न निर्माण झाला असून, डोंगरउतारावरील नगराचे नियोजन करताना तज्ज्ञांची मदत न घेतल्याने गंभीर धोके निर्माण झाले आहेत.

Web Title: This builder-built magnum opus!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.