‘बीएसएनएल’च्या कारभारामुळे गेला मुलाचा जीव

By Admin | Updated: May 30, 2016 00:59 IST2016-05-29T22:22:53+5:302016-05-30T00:59:40+5:30

पित्याचा आरोप : बिले दुरुस्तीसाठी घेऊन जाताना अपघात; आता तर कनेक्शनच केले बंद

BSNL's move came due to child's life | ‘बीएसएनएल’च्या कारभारामुळे गेला मुलाचा जीव

‘बीएसएनएल’च्या कारभारामुळे गेला मुलाचा जीव

सातारा : शासकीय कामातील दिरंगाई, मनमानीमुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होतो; पण बुध येथील कालेकर कुटुंबाला बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराची मोठी किंमत मोजावी लागली. वारंवार येत असलेली दूरध्वनीची चुकीची बिले दुरुस्त करण्यासाठी पुसेगाव येथे हेलपाटे मारत असतानाच एक दिवस कालेकर यांच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. हे कमी काय म्हणून आता तर कालेकर यांचे कनेक्शनही बंद करण्यात आले आहे.
बुध, ता. खटाव येथील प्रदीप कालेकर डोळ्यात पाणी आणून सांगत होते... जानेवारी महिन्यांपासून बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराने आमचं कुटुंब त्रस्त आहे. चुकीच्या बिलाच्या दुरुस्तीसाठी माझ्या मुलांना वारंवार बुध-पुसेगाव असे हेलपाटे मारावे लागत होते. यातच मुलाचा जीव गेला. चूक एक-दोनदा होते; पण वारंवार चुका करून आम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप कालेकर यांनी केला. (प्रतिनिधी)

आता बारावीच्या निकालाचा काय उपयोग?
ओंकार दूरध्वनीचे बिल दुरुस्त करून आणण्यासाठी तो पुसेगावला गेला अन् काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या दुचाकीला झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. बारावी परीक्षेत ओंकार चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला; पण आपला निकाल पाहण्यासाठी ओंकार नव्हता. आता त्या निकालाचा काय उपयोग? बीएसएनएलच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला आमचा मुलगा गमवावा लागल्याचे दु:ख आणि संताप प्रदीप कालेकर यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केला.


वारंवार येणारी दूरध्वनीची चुकीची बिले, कनेक्शन बंद करणे याबाबत बीएसएनएलच्या सातारा येथील मुख्य कार्यालयात तक्रार केली. मात्र, करू, बघू अशी उत्तरे मिळाली. बिल भरले नाही म्हणून आता आमचे कनेक्शन कट केले आहे. आता पुन्हा हेलपाटे मारायचे का? दुसऱ्या मुलाचा जीव गेल्यानंतर बीएसएनएलचे डोके ठिकाणावर येणार आहे का?
- प्रदीप कालेकर, बुध

Web Title: BSNL's move came due to child's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.