महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल
By Admin | Updated: October 30, 2015 23:45 IST2015-10-30T21:20:25+5:302015-10-30T23:45:04+5:30
वडोली निळेश्वर : चाळीस हजार खर्च; नवरात्रोत्सव मंडळ, ग्रामस्थांनी जपली सामाजिक बांधिलकी -- गुड न्यूज

महाप्रसादाच्या खर्चातून बांधला पूल
शंकर पोळ -- कोपर्डे हवेली वडोली निळेश्वर, ता. कऱ्हाड येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांनी आपल्या मंडळाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर चाळीस हजार रुपये खर्च करून पूल बांधला आहे. युवकांनी दाखविलेल्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व ग्रामस्थांनी कौतुकही केले.नवरात्र उत्सवाच्या काळात होणाऱ्या अनावश्यक खर्चाला फाटा देत अनेक उपक्रम सर्वत्र राबविले गेले. मात्र, गावासाठी चांगल्या प्रकारची सुविधा उभारावी या हेतूने उपक्रम राबविणाऱ्यांची संख्या फारच कमी पहावयास मिळते. गावाच्या विकासासाठी वडोली निळेश्वर येथील नवरात्र उत्सव मंडळातील युवकांक डून गेल्या २३ वर्षापासून दुर्गादेवीचा उत्सव साजला केला जातो. यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतीसाठी पाण्याची कमतरता भासत असल्याचे लक्षात घेऊन गावातील युवकांनी ओढ्यातून वाया जाणारे पाणी अडवून ठेवण्यासाठी ओढ्यावर बंधारा बांधला. गावातील सटवाईदेवी मंदिरालगत पूल उभारण्याचा निर्णय युवकांनी घेतला व पूल बांधला.
दरवर्षी या मंडळाकडून ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. महाप्रसादासाठी वीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च येतो. यावर्षी महाप्रसाद रद्द करून गावासाठी कायमस्वरूपी पूल असावा, असा निर्णय युवकांनी घेतला व त्याला ग्रामस्थांनी मंजुरी दिली. त्यानंतर महाप्रसादाच्या खर्चातून गावातील ओढ्यावर पूल बांधण्यात आला.
सहकार्यातून उभारणी
ग्रामस्थांना विश्वासात घेऊन उभारला पूल वडोली निळेश्वरमधील बालवीर मंडळासह इतर मंडळे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवितात. या उपक्रमांना ग्रामस्थांचे चांगले सहकार्य असते. उत्सवाच्या कालावधीत ही मंडळे देणगी स्वरूपात रक्कम जमा करतात. त्यातून उत्सव पार पाडण्याबरोबरच काही विधायक कामे केली जातात. यावर्षी बालवीर मंडळाने पूल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्यासह उपाध्यक्ष विकास पवार, खजिनदार गणेश पवार, सदस्य सुनील पवार, अभिजीत पवार, तानाजी पवार, संभाजी शिंदे, अविनाश पवार, संभाजी पवार यांनी इतर सभासद व सदस्यांशी चर्चा केली. संबंधित देणगी ग्रामस्थांकडून गोळा करण्यात आली असल्याने ती खर्च करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. ज्यावेळी हा विषय ग्रामस्थांसमोर मांडण्यात आला. त्यावेळी त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि पुलाची उभारणी झाली.
गत २३ वर्षापासून आम्ही महाप्रसादाचे आयोजन करीत होतो. मात्र यावर्षी इतर मंडळांसमोर आदर्श ठेवण्यासाठी आणि गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी देणगी स्वरूपातील रक्कम या पुलासाठी वापरली आहे.
- शिवाजी शिंदे
अध्यक्ष,
बालवीर मंडळ