जनतेच्या प्रमाणपत्रासाठी चढाओढ
By Admin | Updated: July 27, 2014 23:07 IST2014-07-27T22:09:07+5:302014-07-27T23:07:18+5:30
टीकाटिप्पणीची ‘अतिवृष्टी’ : कोण पास-कोण नापास, ठरवणार मात्र मतदार

जनतेच्या प्रमाणपत्रासाठी चढाओढ
पाटण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगमनगर पुलाचे भूमिपूजन केले. त्या कार्यक्रमात ‘तुम्ही चांगले काम करताय’ अशी प्रशंसा पाटणकरांनी उपमुख्यमंत्र्यांची केली, अशी टीका करून शंभूराज देसाई यांनी चांगल्या कामाचे प्रमाणपत्र जनता देते, असे सुनावले तर शेडगेवाडी व गणेशवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये सध्या चढाओढ सुरू असून, कोण पास आणि कोण नापास याचा फैसला येत्या दोन महिन्यांतच पाटणची जनता करणार आहे. तोपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या नेत्यांच्या दररोजच्या कार्यक्रमामुळे प्रमाणपत्र देणाऱ्या जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
पाटण तालुक्यातील जनता समाधानी आहे का, हलाखीचे जीवन जगत आहे, हे नुकत्याच चार दिवस झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे उघड झाले. रस्त्यावरील गावे किमान सकाळी उठल्यावर विजेच्या प्रकाशात दुधाचा वाफाळलेला चहा, कडक इस्त्रीचे कपडे, ताजी चपाती, वेगवेगळ्या भाज्या, फिल्टरचे पाणी आणि दारात येणाऱ्या गाडीमुळे समाधानी आहेत. मात्र, पाटण तालुक्याच्या दुर्गम भागात डोंगरावर वसलेली शेकडो गावे अती पावसामुळे गावात वीज नसल्याने अर्धपोटी राहतात; कारण गावात वीज नसल्यामुळे दळण मिळत नाही. ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. घरात गळत असल्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारी पडलेल्या व्यक्ती, लहान मूल, गरोदर मातांना पाटण, मोरगिरी, कोयनानगर किंवा ढेबेवाडीला न्यायचे झाल्यास अंधारातून चारचौघांनी डोलीतून घेऊन जायचे किंवा एखादी मोडकीतोडकी जीप बघून ४० किलोमीटर अंतर कापायचे. वाटेतच जर काही बरं वाईट झाले तर पेशंट जीवाला मुकले. अशा घटना आजही तालुक्यात घडत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न जनतेला पडला आहे. (प्रतिनिधी)