कऱ्हाड : वाहतूक पोलिसांशी वाहनधारकांचा वाद होण्याच्या घटना वारंवार घडतात. घटनेनंतर पोलिस त्यांची बाजू मांडतात. तर वाहनधारक पोलिसांनीच आरेरावी केल्याचे सांगतात. मात्र, आता वाहतूक पोलिसांशी वाद घालणे वाहनधारकांना भोवणार आहे. कऱ्हाडात वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ देण्यात आले असून या कॅमेऱ्यांमध्ये आवाज आणि छायाचित्रणही संकलित होणार आहे.कऱ्हाडात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून, सध्या सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे. त्यातच अनेक वाहनचालक चुकीच्या पद्धतीने पार्किंग करतात किंवा सिग्नल तोडतात. नियम मोडणाऱ्यांवर जेव्हा वाहतूक पोलिस कारवाई करतात, तेव्हा काही जण हुज्जत घालतात.थेट राजकीय दबाव टाकतात. काही वेळा महिला पोलिसांशीही उद्धट वर्तन करतात. या सर्व गोष्टींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या संकल्पनेतून आणि अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या पुढाकाराने कऱ्हाडात वाहतूक पोलिसांना ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ देण्यात आले आहेत.उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदीप सूर्यवंशी, उपनिरीक्षक संतोष जगदाळे, राजेंद्र घाडगे, विजय भोईटे यांनी कर्मचाऱ्यांना कॅमेरा कसा वापरायचा, याबाबतचे प्रशिक्षण दिले. कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी सांगितले.
वाहतूक शाखेत..
- १ : सहायक निरीक्षक
- ४ : उपनिरीक्षक
- ३५ : कर्मचारी
वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करीत असताना वाहनधारक त्यांच्याशी वाद घालतात. त्यानंतर पोलिसांवरच आरोप केले जातात. कऱ्हाडात यापूर्वी अशा घटना घडल्या आहेत. मात्र, आता पोलिसांकडे ‘बॉडी वॉर्न कॅमेरे’ असल्यामुळे कोणी वाद घातला, कोण काय बोलले, याचा पुरावा उपलब्ध होणार आहे. - संदीप सूर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक, कऱ्हाड