मयूरवर पहिला वार करणाऱ्यास अटक
By Admin | Updated: June 23, 2014 00:53 IST2014-06-23T00:26:29+5:302014-06-23T00:53:00+5:30
चौथा आरोपी : मुख्य संशयिताच्या ओळखीतून खुनात सहभाग

मयूरवर पहिला वार करणाऱ्यास अटक
कऱ्हाड : शहरातील सोमवार पेठेतील मयूर गोरे याच्या खूनप्रकरणात चौथ्या आरोपीला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. श्रीयाल ऊर्फ गोट्या भीमराव धेंडे (वय २३, रा. वानलेसवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. श्रीयाल हा रविवारी स्वत:हून पोलिसांना शरण आला. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे.
पिग्मी एजंट असणाऱ्या मयूर गोरे या युवकाचा जखिणवाडी येथील पाणंद रस्त्यावर काही दिवसांपूर्वी निर्घृण खून करण्यात आला होता. चार हल्लेखोरांनी मयूर व त्याचा मावसभाऊ सिद्धार्थ यांच्यावर सुरूवातीला कोयत्याने वार केला. त्यानंतर जीव वाचविण्यासाठी सिद्धार्थ उसाच्या शेतात तर मयूर रस्त्याकडील लोकवस्तीकडे धावला. त्यावेळी हल्लेखोरांनी पाठलाग करून मयूरला गाठले. त्यांनी त्याच्यावर गोळीबार करून तसेच डोक्यात खोऱ्याचा घाव घालून मयूरचा खून केला. या खून प्रकरणामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती.
या प्रकरणाच्या तपासात सुरूवातीला मास्टरमार्इंड वैभव रमेश माने (रा. कार्वेनाका-कऱ्हाड) याला कऱ्हाड शहर पोलिसांनी अटक केली. नातेवाइक महिलेशी मयूरचे असलेले मैत्रीचे संबंध भविष्यात आपल्यासाठी बदनामीकारक ठरू शकतात, या भीतीपोटी वैभव माने याने मयूरचा खून करविला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. त्यानुसार पोलिसांनी वैभवला अटक करून त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सागर खुबू पवार (रा. लमाण तांडा नं. २, विजापूर), अनिल तानाजी माळी (रा. कालेटेक) या दोघांना अटक केली. फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच रविवारी श्रीयाल ऊर्फ गोट्या धेंडे स्वत:हून पोलिसांना शरण आला. त्याला पोलिसांनी अटक केली.
श्रीयाल याच्यावर कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. २०११ मध्ये सुपारी देऊन झालेल्या खूनप्रकरणात तो आरोपी होता. मयूर गोरेची ज्याने सुपारी घेतली होती त्याच्याशी कळंबा कारागृहात असताना त्याची ओळख झाली. सहा महिन्यांपूर्वीच श्रीयाल व संबंधित आरोपी दोघेही जामिनावर बाहेर आले.
त्यानंतर श्रीयालने सांगलीत रिक्षा चालविण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी मयूर गोरे खून प्रकरणातील फरार मुख्य आरोपी सांगलीला गेला असता त्याची आणि श्रीयालची भेट झाली. त्यानंतर ७ जूनला संबंधित मुख्य आरोपीला फोन करून श्रीयाल कऱ्हाडला राहण्यासाठी आला. कऱ्हाडात आल्यानंतर त्याच्यासह इतर आरोपींनी कट रचून त्यानुसार मयूरचा खून केला.
या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)