मृत्यूच्या सावलीखाली तब्बल १५० कुटुंबीय !
By Admin | Updated: June 23, 2016 01:17 IST2016-06-22T23:49:36+5:302016-06-23T01:17:10+5:30
सातारा पालिका : मालक-भाडेकरूंमुळे नाईलाज; केवळ नोटीस चिटकविण्याची कारवाई

मृत्यूच्या सावलीखाली तब्बल १५० कुटुंबीय !
सातारा : मोडकळीस आलेल्या इमारती.. मात्र भाडेकरू आणि मालकांचा वाद सुरू असल्यामुळे जीव धोक्यात घालतायेत परंतु घर सोडण्यास मात्र अनेकजण तयार नाहीत. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांना केवळ इमारतीच्या भिंतीवर नोटीस चिकटविण्यापलीकडे काहीच करता येत नाही. एखादी दुर्घटना घडली तर पालिकेच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा वेळीच सावध राहा असा गर्भीत इशाराही पालिकेने दिला आहे.
शहरात अनेक ठिकाणी धोकादायक इमारती आहेत. शहरामध्ये नवनवीन इमारती तयार होत असल्या तरी फार वर्षांपूर्वी बांधलेल्या इमारती पालिकेच्या धोकादायक लिस्टमध्ये येत आहेत. त्यामुळे हा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरात तब्बल १५० इमारती धोकादायक असून, त्यामध्ये ५ इमारती केव्हाही पडण्याच्या मार्गावर आहेत. अशा इमारती अत्यंत धोकादायक असतानाही या इमारतीमध्ये राहणारे लोक घरे सोडण्यास तयार होत नाहीत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच धोकादायक इमारतीमधील लोकांनी आत्ताच तेथील वास्तव्य सोडावे, अशा प्रकारच्या नोटिसाही पालिकेने संबंधित घरमालकांना पाठविल्या आहेत. परंतु त्याचा काहीएक उपयोग होत नाही, अशी हताश प्रतिक्रिया पालिकेचे अधिकारी देत आहेत.
घरमालक इमारत पाडण्यास तयार झाला तर त्याला भाडेकरू अडथळा आणून न्यायालयात धाव घेत आहेत. गेल्या दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात गणेशोत्सव मिरवणुकीच्या वेळी सिटी पोस्टाशेजारील एका इमारतीची भिंत कोसळून दोघांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यावेळीही पालिकेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पालिकेने अशा धोकादायक इमारती का पाडल्या नाहीत, असेही प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु पालिकेने संबंधित मालकांना नोटिसा पाठविल्याचे पुढे आल्यानंतर टीकाकारांची तोंडे बंद झाली. (प्रतिनिधी)
कुटुंबाचा विचार करा..
एखादी ुर्दैवी घटना घडल्यानंतरच लोक यावर चर्चा करतात. परंतु ही घटना घडू नये म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांना कोणीही हातभार लावत नाही, अशी खंतही एका अधिकाऱ्याने व्यक्त केली. आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून पालिकेने धोकादायक इमारतीवर नोटीस चिटकवून खबरदारी घेतली आहे. मात्र रोज मृत्यूच्या सावलीखाली राहण्यापेक्षा आपल्या कुटुंबाचा विचार करा, असे भावनिक आवाहनही पालिकने यानिमित्ताने केले आहे.
धोकादायक इमारतीमध्ये राहू नका, असे लोकांना वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र कोणीही ऐकत नाही. अनेकांचे वाद न्यायालयात सुरू आहेत. त्यामुळे आमचाही नाईलाज होत आहे.
- प्रदीप साबळे (बांधकाम अभियंता, सातारा पालिका)