इंद्रायणीतील पूल दुर्घटनेनंतर सातारकरांची वाढली धास्ती!, सारोळा पुलावरून ये-जा करताना भरतेय धडकी!

By सचिन काकडे | Updated: June 16, 2025 15:24 IST2025-06-16T15:23:38+5:302025-06-16T15:24:58+5:30

पावसापूर्वी ‘बांधकाम’कडून ३२ पुलांची पाहणी; ब्रिटिशकालीन पुलांची व्हावी नव्याने बांधणी

After the bridge accident on the Indrayani river, the issue of safety of Sakav bridges in Satara district is under discussion again | इंद्रायणीतील पूल दुर्घटनेनंतर सातारकरांची वाढली धास्ती!, सारोळा पुलावरून ये-जा करताना भरतेय धडकी!

इंद्रायणीतील पूल दुर्घटनेनंतर सातारकरांची वाढली धास्ती!, सारोळा पुलावरून ये-जा करताना भरतेय धडकी!

सातारा : इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर सातारा जिल्ह्यातील प्रमुख मार्गावरील तसेच गावांना जोडणाऱ्या साकव पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्ह्यातील ३२ पुलांची मान्सूनपूर्व पाहणी करण्यात आली असली तरी अनेक ब्रिटिशकालीन पुलांनी वयाची शंभरी ओलांडली असून, ते आजही वापरात आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका ओळखून जिल्हा प्रशासनाने जुन्या पुलांच्या जागी नवीन पुलांची बांधणी करणे गरजेचे बनले आहे.

सातारा जिल्ह्याचे भौगाेलिकदृष्ट्या दोन भाग पडतात. एक पूर्व, तर दुसरा पश्चिम. पश्चिमेकडील सातारा, जावळी, महाबळेश्वर, वाई, कऱ्हाड, पाटण हे तालुके अतिपर्जन्यवृष्टीचे आहेत. ब्रिटिश राजवटीत ठिकठिकाणी पुलांची उभारणी करण्यात आली. यातील बहुतांश पूल हे नद्यांवर असून, त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. हे पूल ऊन, वारा, अतिवृष्टी अन् अवजड वाहतुकीमुळे कमकुवत होऊ लागले आहेत. गावांना जोडणाऱ्या साकव पुलांची अवस्थाही काहीशी अशीच आहे.

रविवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवरील साकल पूल अचानक कोसळला. यामध्ये जीवितहानी तर झालीच शिवाय काही पर्यटक नदीत वाहून गेले. या घटनेनंतर जिल्ह्यातील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते. नद्या, ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्यानंतर अनेक लहान-मोठे पूल पाण्याखाली जातात. बऱ्याचदा पुलांचा काही भाग वाहून जातो, दगड सैल होतात. त्यामुळे बांधकाम विभागाकडून मान्सून सुरू होण्यापूर्वी पुलांची तपासणी केली जाते. यंदादेखील ३० मीटर व त्यापेक्षा अधिक उंची असलेल्या पूर्व, पश्चिम भागातील ३२ पुलांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, शतकाहून अधिक काळ सेवेत असणाऱ्या ब्रिटिशकालीन पुलांचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे.

सारोळा पुलावरून ये-जा करताना भरतेय धडकी!

  • पुणे व सातारा जिल्ह्याला जोडणारा नीरा नदीवरील सारोळा पूल गेली अनेक वर्षेत चर्चेत आहे. कारण या पुलावरून वाहन मार्गस्थ झाल्यानंतर बसणाऱ्या हादऱ्यांनी प्रवाशांच्या काळजाचा ठोकाच चुकतो.
  • या पुलावर आजवर अनेक अपघात घडले आहेत. आत्महत्येचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे नदीपात्रात शोधमोहीम राबवत असताना पूल जोडण्यासाठी वापरण्यात आलेले काही नटबोल्ट निघाले असल्याची धक्कादायक बाब रेस्क्यू टीमच्या निदर्शनास आली.
  • याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला सूचित करूनही दुर्लक्ष करण्यात आल्याचे शिरवळ ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


बांधकाम मंत्र्यांनीच प्रश्न गांभीर्याने घ्यावा..

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्यमार्ग व जिल्हा मार्गावरील पुलांचे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट (सुरक्षा तपासणी) केले जाते. पुलांमध्ये काही किरकोळ किंवा मोठी दुरुस्ती असेल, तर ती तातडीने केली जाते. मात्र, ब्रिटिश आमदनीत उभारण्यात आलेल्या पुलांचा प्रश्न अजूनही ‘जैसे थे’ आहे. दोन वर्षांपूर्वी वाईच्या कृष्णा नदीवरील जुना पूल पाडून त्याजागी नवीन पुलाची बांधणी करण्यात आली. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ब्रिटिशकालीन पुलांसाठी ‘वाई प्रकल्प’ राबवावा, अशी अपेक्षा आहे.

..तरीही वाहतूक सुरू

संगममाहुली येथे कृष्णा नदीवर असलेला कृष्णा पूल, वडूथ-आरळे व वाढे येथील दोन ब्रिटिशकालीन पूल, मेढा-महाबळेश्वर मार्गावर वेण्णा नदीवरील पूल, सातारा येथे पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाढे हद्दीत असलेला जुना पूल, यांसह कऱ्हाड, पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई या तालुक्यांतील अनेक साकव पुलांची अवस्था गंभीर आहे. तरीही या पुलावरील वाहतूक अखंड सुरू आहे.

Web Title: After the bridge accident on the Indrayani river, the issue of safety of Sakav bridges in Satara district is under discussion again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.