पेरण्या झाल्यावर म्हणे... ‘बियाणं घ्या !’
By Admin | Updated: June 23, 2016 01:22 IST2016-06-22T23:51:50+5:302016-06-23T01:22:09+5:30
कऱ्हाड तालुका : कृषी विभागाचं वरातीमागून घोडं; सदस्य अधिकाऱ्यांकडून पाऊस, पाण्यावर चर्चा; वीजवितरणसह प्राधिकरणही धारेवर

पेरण्या झाल्यावर म्हणे... ‘बियाणं घ्या !’
कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी साठ टक्के पेरण्या पूर्ण केलेल्या आहेत. मात्र, आता शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरण्या करण्यासाठी उत्तम दर्जाची बियाणे आणली आहेत. त्यामुळे त्या बियाण्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले गेल्याने वरातीमागून घोडे असा प्रकार बुधवारी पंचायत समितीच्या सभेत पाहायला मिळाला.
‘पावसानेच दडी मारल्याने शेतकऱ्यावर आता दुबार पेरण्या करण्याची वेळ येणार असल्याचे सांगत शासनाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता नवीन बियाने व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन तालुका कृषी अधिकारी खरात यांनी सभेदरम्यान केले. यावेळी तालुक्यातील धोकादायक पोल, पावसाळापूर्व केला जाणारा सर्व्हे तसेच तांबवे येथे ढासलेल्या पाण्याच्या टाकी प्रकरणावरून वीजवितरण व जीवन प्राधिकरण विभागाला सदस्यांनी धारेवर धरले.
कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा बुधवारी समितीच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात
पार पडली. सभेस अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील उपस्थित होते. गटविकास अधिकारी
अविनाश फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सभेच्या सुरुवातीस वीजवितरण कंपनीच्या विभागाचा आढावा अधिकारी वायदंडे यांनी सादर केला. यावेळी सदस्या अनिता निकम, रूपाली यादव, राजश्री थोरात, सदस्य लक्ष्मण जाधव, राजेंद्र बामणे, भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
‘पावसाळा आला तरी अद्याप वीजवितरणकडून तालुक्यातील वाकलेले विद्युत खांब, धोकादायक स्थितीत असलेले ट्रान्सफॉर्मर तसेच लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. विभागाकडे कर्मचारी असूनही खासगी लोकांकडून कामे करून का घेतली जात आहेत. याचा खुलासा अधिकाऱ्यांनी करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. आढावा देण्यापेक्षा अगोदर कामे करा तसेच संपूर्ण तालुक्याचा सर्व्हे विभागाकडून केला जावा, अशी मागणी सदस्य लक्ष्मण जाधव यांनी केली. तर अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊ नये. त्यांनी कामे करावी,’ अशा सूचना सदस्या रूपाली यादव यांनी केल्या.
तांबवे येथील पाणी पुरवठ्याची टाकी कोसळ्याने या घटनेस जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करावी व जीवन प्राधिकरणमार्फत नवीन टाकी बांधून देण्यात यावी, असा ठराव करण्यात आला. तांबवे प्रमाणे इतर गावांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून जीवन प्राधिकरण विभाग व पाणीपुरवठा विभागांमार्फत तालुक्यातील धोकादायक स्थितीत असलेल्या पाण्याच्या टाकीचा सर्व्हे करावा, अशा सूचना सभापती देवराज पाटील यांनी दिल्या. तसेच कृषी विभागाच्या आढावावेळी तालुक्यात १८ हजार ७०९ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी खरात यांनी दिली.
दरम्यान जिल्ह्याला यावर्षी सोयाबीन बियाण्याचा कार्यक्रम आला नसल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात जिल्ह्याचा समावेश करावा, असा ठराव सभापती देवराज पाटील यांनी मांडला.
यावेळी पशुसंवर्धन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, वनविभाग, एसटी महामंडळ आदी विभागांचा आढावा मांडण्यात आला. (प्रतिनिधी)
अधिकारी, सदस्य म्हणे
आता निसर्गावरच विश्वास
प्रत्येकवेळी हवामान खात्याकडून पाऊस पडण्याचे संकेत दर्शविले जातात. सध्या वातावरण तर ढगाळ दिसते मात्र, पाऊस पडत नाही. त्यामुळे आता हवामान खात्यापेक्षा निसर्गावरच विश्वास ठेवून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल, असे मत सभेदरम्यान सदस्य व अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रमासाठी रोपांची मागणी वाढली
शासनाच्या सूचनेनुसार १ जुलै रोजी दोन कोटी वृक्षलागवड कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाकडे ७६ हजार रोपे तर परिक्षेत्र वनविभागाकडे ४७ हजार ५०० रोपे तयार असल्याने त्यांची मागणी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याची माहिती संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
पाण्याच्या टाकीचा व जिल्ह्याचा योजनेत सहभागाचा ठराव
तांबवे येथे कोसळलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीच्या दुर्घटनेची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेस जबाबदार असलेल्या एकाही अधिकाऱ्यांना सोडले जाणार नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच जाईल, असे सांगत गावकऱ्यांना जीवन प्राधिकरणाकडून नवीन टाकी बांधून देण्यात यावी व सोयाबीन बियाणे वाटप कार्यक्रमात जिल्ह्याचा समावेश करावा, असे दोन महत्त्वपूर्ण ठराव पंचायत समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत करण्यात आले.