आदर्श धामणेरचे सरपंच राज्य समितीचे अध्यक्ष
By Admin | Updated: July 25, 2014 22:16 IST2014-07-25T22:03:41+5:302014-07-25T22:16:52+5:30
पुन्हा बहुमान : ग्रामस्वच्छता चळवळीला बळ

आदर्श धामणेरचे सरपंच राज्य समितीचे अध्यक्ष
सातारा : ‘आदर्श गाव’ धामणेरला आणखी एक बहुमान मिळाला आहे. संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता राज्यस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी धामणेरचे सरपंच शहाजीराव क्षीरसागर यांची निवड झाली आहे.
राज्य शासनाने २००० मध्ये संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. त्याला राज्यात उदंड प्रतिसाद मिळाला. ही चळवळ देशभर गाजली आणि बघता-बघता जागतिक स्तरावरही त्याची नोंद घेतली गेली. कोट्यवधी रुपयांची किासकामे यातून झाली. गावागावातील लोकांना श्रमदानाचे महत्त्व समजू लागले . ही चळवळ वाढावी म्हणून आॅगस्ट २००९ मध्ये तत्कालीन पाणीपुरवठा, स्वच्छतामंत्री अजित पवार यांनी संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता राज्यस्तरीय समितीची स्थापना केली. त्यास शासनाने मान्यता दिली. नांदेड जिल्ह्यातील माधवराव पाटील-शेळगावकर यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड झाली. समितीच्या अध्यक्षांना शासनाची गाडी, स्वीय सहायक, दूरध्वनी सुविधा व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा पुरविण्यात आल्या.
शेळगावकर यांच्यानंतर हिवरे बाजारचे पोपटराव पवार, हर्षवर्धन सपकाळ, भारत पाटील, डॉ. मीनाक्षी सावंत, डॉ. निशिगंधा माळी, चंदू पाटील मारकवार, दिलीप परब, डॉ. म्हापुसकर आणि श्रीकांत मावरेकर अशा व्यक्तींनी या समितीचे अध्यक्षपद भूषविले आहे. शहाजीराव क्षीरसागर यांनी २००० पासून धामणेरमध्ये ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून मोठे काम उभे केले. धामणेरला या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नंतर पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजनेत विकासरत्न व राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. तंटामवुक्ती अभियानात विशेष शांतता पुरस्कार मिळाला. राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा वनश्री पुरस्कार, यशवंत पंचायत राज अभियानात विभागात प्रथम क्रमांक असे अनेक पुरस्कार गावाला मिळाले. (प्रतिनिधी)