प्रतापगडावर ३६३ मशालींचा लखलखाट; स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण, मशाल महोत्सवाचे आयोजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2022 10:48 PM2022-09-29T22:48:53+5:302022-09-29T22:49:54+5:30

Pratapgad : गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.

A flash of 363 torches at Pratapgad; Organizing torch festival | प्रतापगडावर ३६३ मशालींचा लखलखाट; स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण, मशाल महोत्सवाचे आयोजन 

प्रतापगडावर ३६३ मशालींचा लखलखाट; स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे पूर्ण, मशाल महोत्सवाचे आयोजन 

Next

महाबळेश्वर किल्ले प्रतापगड अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. स्वराज्य स्थापनेला ३६३ वर्षे झाल्याने गुरुवारी रात्री ३६३ मशालींनी प्रतापगडाचा संपूर्ण परिसर उजळून काढण्यात आला. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सवातील चतुर्थीला ३५९ वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गत २०१० सालापासून ही परंपरा सुरू असून, यंदा या उत्सवाचे १३ वे वर्ष आहे.

किल्ले प्रतापगडवर ढोल-ताशांच्या गजर आणि फट्याक्यांची आतषबाजीत सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्तांनी चौथ्या माळेला हजेरी लावली. राजमाता कल्पनाराजे भोसले याही या महोत्सवाला उपस्थित होत्या. चतुर्थी दिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला. हा कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी स्वराज्य ढोल-ताशा पथकाच्या गजरात व भगवे झेंडे फडकावित मशाली पेटवून मशाल महोत्सव साजरा झाला. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. गडावर सर्वत्र लावण्यात आलेल्या मशाली व फटाक्यांच्या आतषबाजीने गडावरील हा नयनरम्य नजराणा उपस्थितांना डोळ्यांत साठवून ठेवला.

सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त गडावर आले होते. गडावरील मंदिर परिसर व मुख्य द्वाराला चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आलेल्या सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सर्व आयोजन चंद्रकांत उतेकर, किल्लेदार विजय हवलदार, संतोष जाधव, आनंद उतेकर, संदीप राऊत, विलास जाधव प्रतापगड, तसेच वाडा कुंभरोशीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतापगडावर दोन घटांची होते प्रतिष्ठापना
प्रतापगडावरील घटस्थापनेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात दोन घट बसविले जातात. एक छत्रपती महाराजांच्या नावाने कारण त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांच्या नावाने. कारण राजाराम महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा पाया मजबूत केला. त्यांचे गडावर कित्येक वर्षे वास्तव्य होते. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे. राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी करून मनमोहक झुंबरे बसविल्यामुळे मंदिर परिसरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: A flash of 363 torches at Pratapgad; Organizing torch festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.