कोयनेत ७ टीएमसी पाणीसाठा
By Admin | Updated: June 14, 2016 00:12 IST2016-06-13T23:06:24+5:302016-06-14T00:12:22+5:30
गेल्यावर्षीपेक्षा तुलनेत चौपट पाणी कमी : जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये खडखडाट
कोयनेत ७ टीएमसी पाणीसाठा
सातारा : जिल्ह्यात मान्सूनचे आगमन दरवर्षी सरासरी ७ जूनला होते. यंदा मात्र १२ जून उजडला तरी मान्सून राज्यात आला नाही. त्यातच मान्सूनपूर्व पावसाने पाठ फिरविल्याने धरणांमध्ये खडखडाट जाणवत आहे. कोयनेत केवळ सात टीएमसी पाणी शिल्लक असून, गेल्या वर्षी याच दिवशी २५.१९ टीएमसी पाणी होते.जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई, सातारा, जावळी, पाटण हे तालुके अती पावसाचे म्हणून ओळखले जातात. या भागांत मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा राज्यातच मान्सून आलेला नसल्याने हे तालुके पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
याउलट माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुक्यांचा काही भाग दुष्काळी म्हणून ओळखला जातो. दुष्काळावर मात करण्यासाठी या परिसरात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाली आहेत. त्यातच मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुसेगाव, माण, खटाव तालुक्यांत वळवाचा पाऊस चांगला झाला. त्यामुळे तेथील शेतकरी मशागतीच्या कामाला लागले आहेत.
उर्वरित जिल्ह्यात पाऊस झालेला नसल्याने सर्वच धरणे कोरडी आहेत. सर्वाधिक पाणी कोयना धरणात ७.५३ टीएमसी असून, त्या खालोखाल उरमोडीत ३.३६ टीएमसी पाणी आहे. या दोन्ही धरणात गेल्या वर्षी आजच्या तारखेला कोयनेत २५.१९ तर उरमोडीत ६.३६ टीएमसी पाणी होते. धरणातील पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. (प्रतिनिधी)
१२ जूनचा पाणीसाठा
धरण२०१६२०१५
कोयना ७.५३ २५.१९
धोम ०.९८१.६७
कण्हेर १.४१२.३३
धोम-बलकवडी ०.५२०.२२
उरमोडी ३.३६६.३६
तारळे १.४३०२.४५
येरळवाडी ०००.१२
मोरणा ०.५८०.५८
उत्तरमांड ०.२८०.३८५
नागेवाडी ०.७६०.१३०
महू ०.०९३०.०४६
हातगेघर ०.०४२००.०२८
वीज निर्मितीवर प्रश्नचिन्ह
दरवर्षीपेक्षा यंदा लवकर व मोठ्या प्रमाणावर पाऊस होईल असे भाकीत वेदशाळेने वर्तविले होते. त्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, ७ जूनला येणारा मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवरच खोळंबला आहे. १३ जूननंतरही पाऊस पडलेला नसल्याने ही परिस्थिती आणखी काही दिवस राहिली तर धरणांमधील वीज निर्मिती कशी होणार असा प्रश्न सातारकरांमधून विचारला जात आहे.