काेराेनाकाळात जिल्ह्यात ५१ मुली सैराट; २८ घरी परतल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:53 IST2021-02-25T04:53:26+5:302021-02-25T04:53:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सातारा : प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, वर्षभरात जिल्ह्यात ५१ मुली व मुले घरातून ...

काेराेनाकाळात जिल्ह्यात ५१ मुली सैराट; २८ घरी परतल्या
लाेकमत न्यूज नेटवर्क
सातारा : प्रेमसंबंधातून घरातून पळून जाण्याचे प्रमाण वाढले असून, वर्षभरात जिल्ह्यात ५१ मुली व मुले घरातून पळून गेली असल्याचे समोर आले आहे; तर यातील केवळ २८ मुली घरी परतल्या आहेत. काही मुलींना पोलिसांना शोधावे लागले.
पूर्वीची ॲरेंज मॅरेजची पद्धत सध्याच्या काळात हळूहळू लुप्त होतेय की काय, अशी भीती समाजमनातून व्यक्त होत आहे. हल्लीची तरुणाई स्वतंत्र विचारसरणीची आहे. स्वत:चे निर्णय स्वत: घेणारी ही पिढी असल्यामुळे आपल्या भावी आयुष्याचा कोण जोडीदार असेल, याचा निर्णयही हीच पिढी घेत आहे. वर्षभरापूर्वी कोराेनाने जिल्ह्यात प्रचंड कहर माजविला होता. असे असतानाही जिल्ह्यातून २८ मुली घरातून गायब झाल्या होत्या. काही पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली; तर काही पालकांनी मुलीचा शोध न घेणेच पसंत केले. अल्पवयीन मुलीच्या पालकांनी मात्र, पोलिसांच्या मागे चांगलचा ससेमिरा लावला.
१५ मुलींचा शोध लागेना
घरातून निघून गेलेल्यांपैकी काही मुली सज्ञान आहेत. या मुलींनी ‘मी माझ्या मर्जीनुसार लग्न केले आहे,’ असे सांगितले आहे. त्यामुळे अशा मुलींचा शोध पोलिसांनी थांबविल्यात जमा आहे.
पोलिसांचाही नाइलाज
अनेकदा मुले-मुली घरातून पळून गेल्यानंतर पालक अस्वस्थ होतात. दोघे सहमतीने पळून गेले असले तरी त्यांना शोधण्याचा आग्रह घरातील लोक धरत असतात. त्यामुळे पोलिसांना अशा पळून गेलेल्या मुलांना शोधावेच लागते. इतर गुन्ह्यांचा तपास करीत पोलिसांना सैराट मुला-मुलींचा शोध घ्यावा लागतो.
२३ मुलेही बेपत्ता
काही मुले प्रेमप्रकरणातून घरातून निघून गेली आहेत; तर काही मुलांनी काैटुंबिक कलहातून घर सोडले आहे. ‘मिसिंग’ची फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलीस युवकांचा बऱ्याचदा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुले सापडत नाहीत.