कऱ्हाड तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST2021-01-08T06:04:07+5:302021-01-08T06:04:07+5:30
कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. छाननीत त्यापैकी ३००९ अर्ज ...

कऱ्हाड तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध
कऱ्हाड तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. इच्छुकांनी उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. छाननीत त्यापैकी ३००९ अर्ज वैध ठरले असून, सोमवारी दुपारपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत होती. त्यासाठी येथील प्रशासनकीय कार्यालयात सकाळपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. राजकीय घडामोडींना वेग आला होता. अर्ज माघारीसाठी मनधरणी करताना नेत्यांची दमछाक होताना दिसत होती. अखेर मुदतीत एकूण १ हजार ८३ इच्छुकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. निवडणुकीचे एकूण चित्र दुपारी स्पष्ट झाले. तालुक्यातील १७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून, त्यामध्ये कामथी, किरपे, येणके, संजयनगर, वाघेश्वर, लटकेवाडी, महारुगडेवाडी, टाळगाव, भुरभुशी, अंबवडे, चिखली, पाचुंद, गोटे, वसंतगड, उंडाळे, हरबरवाडी व विरवडे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर २४६ उमेदवारही बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामध्ये हजारमाची ५, कामथी ७, किरपे ७, येणके ९, ओंड २, खुबी २, संजयनगर ९, शहापूर ८, वाघेश्वर ६, म्हासोली ७, लटकेवाडी ५, गमेवाडी ३, साकुर्डी १, भोळेवाडी ५, साळशिरंबे १, महारुगडेवाडी ७, शेवाळवाडी ४, शेळकेवाडी १, सवादे ६, शेवाळवाडी-उंडाळे २, पाडळी १, घोगाव ४, टाळगाव ९, गोटेवाडी १, भुरभुशी ७, शिवडे ५, भवानवाडी ४, अंबवडे ५, खालकरवाडी २, हरपळवाडी ३, वराडे १, आबईचीवाडी ६, खराडे २, नवीन कवठे १, गोळेश्वर २, खोडजाईवाडी ५, वाठार २, कोळे १, बामणवाडी २, पाचुंद ५, गोटे ११, वसंतगड ९, नांदलापूर १, भरेवाडी ३, काले ४, चौगुलेमळा ५, उंडाळे ९, अक्काईचीवाडी ३, हणबरवाडी ९, भुयाचीवाडी ३, विरवडे ११, वाघेरी १, कोडोली ६, गोवारे येथील १ अशा २४६ उमेदवरांचा समावेश आहे.
तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्थानिक आघाड्यांत दुरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. तर काही गावांमध्ये तिहेरी निवडणूक होत आहे. त्यामुळे गावागावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारपासून निवडणुकीला खऱ्या अर्थाने रंगत आली आहे.
- चौकट
चिन्ह वाटपात कही खुशी, कही गम
उमेदवारी अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप करण्यात आले. अपेक्षित चिन्ह मिळण्यासाठी अनेकांनी देवाला साकडे घातले होते. मात्र, चिन्ह वाटपात कही खुशी, कही गम असे वातावरण दिसले. अनेकांना अपेक्षित चिन्ह न मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी निराशा होती. तर काहींच्या अपेक्षित चिन्ह मिळाल्याचा आनंद होता.