खंडाळा तालुक्यात १६ गावांना फटका
By Admin | Updated: December 26, 2014 00:19 IST2014-12-25T21:24:41+5:302014-12-26T00:19:09+5:30
अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे : तब्बल ५० लाखांचे नुकसान

खंडाळा तालुक्यात १६ गावांना फटका
खंडाळा : अवकाळी पावसाने खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तालुक्यातील १६ गावांमधील सुमारे १८८ हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली असून, तब्बल ५० लाखांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई तातडीने मिळण्याच्या प्रतीक्षेत तालुक्यातील शेतकरी वर्ग आहे.
गत आठवड्यात तालुक्यात सलग तीन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. यामध्ये सुखेड, बोरी, पाडळी, निंबोडी, खेड बुद्रुक, लोणंद, मरिआईचीवाडी, बावकलवाडी, वाघोशी, कराडवाडी, अंदोरी या प्रमुख गावांसह १६ गावांत शेतीचे मोठे नुकसान झाले. या गावांमधील ५१२ शेतकऱ्यांची उभी पिके भुईसपाट झाली असून, पोटऱ्यात आलेल्या ज्वारीचे तसेच कांद्याचे मोठे नुकसान झाले. डाळिंबीच्या बागांचेही काही प्रमाणात नुकसान झाले. या हंगामातील उत्पादित क्षेत्रांपैकी १८८ हेक्टर क्षेत्रात तब्बल ५० लाखांचे नुकसानाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले आहे. तालुक्यात कांद्याच्या नगदी पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. लोणंदच्या कांदा बाजारपेठेत लाखो रुपयांचा कांदा विकला जातो. येथून परदेशातही कांद्याची निर्यात केली जाते; परंतु यावर्षीच्या नुकसानीमुळे कांदा उत्पादन घटून लाखोंचा तोटा होणार आहे.
नुकसानीची पाहणी विभागीय कृषी अधिकारी चांगदेव बागल, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, तहसीलदार शिवाजी तळपे यांनी केली आहे. पकांच्या नुकसानीचा मोबदला तातडीने मिळणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. हजारो रुपये भांडवल घालून पिके बहरात आली असताना शेतकऱ्यांना या नुकसानीचा सामना करावा लागतोय. त्यांना तातडीने रोख मदत मिळायला हवी.
- शिवाजीराव शेळके, संचालक कृ. उ. बाजार समिती
नुकसानग्रस्त शेतीच्या पिकांची पाहणी करण्यात आली आहे. बहुतांशी पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा एकत्रित अहवाल शासनाकडे पोहच करण्यात येणार आहे. साधारण ५० लाखांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. शेतकऱ्यांना शासनाकडून भरपाई देण्यासाठी आम्ही प्रयत्नश्ीाल आहोत.
दत्तात्रय खरात, तालुका कृषी अधिकारी