जिल्ह्यात १५ दिवसांत १०८३ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST2021-02-17T04:46:51+5:302021-02-17T04:46:51+5:30
सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृतांचाही आकडा वाढत चालला आहे. फेब्रुवारीतील १५ दिवसांचा विचार करता ...

जिल्ह्यात १५ दिवसांत १०८३ रुग्ण
सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण आणि मृतांचाही आकडा वाढत चालला आहे. फेब्रुवारीतील १५ दिवसांचा विचार करता एक हजार ८३ रुग्ण आढळून आले असून, २० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची वाढती संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरू लागली आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्याच्या शेवटी कोरोनाचा रुग्ण आढळला. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. कधी १०, २०, तर कधी ५० पर्यंत कोरोनाचे रुग्ण आढळून येत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांत झपाट्याने वाढ होण्यास सुरुवात झाली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढली. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत तर कोरोनाचा कहर होता. कधी ६००, ७००, तर कधी ८०० च्यावर कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली. यामुळे सप्टेंबरअखेर कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील संख्या ३७ हजारांवर गेली. तसेच मृतांचा आकडाही वाढला.
ऑक्टोबर उजाडताच कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या कमी होऊ लागली. नोव्हेंबर महिनाही आणखी दिलासादायक ठरला. कारण, ऑक्टोबरच्या तुलनेत निम्मेच रुग्ण आढळून आले. नोव्हेंबरमध्ये चार हजार ४५० बाधित निष्पन्न झाले, तर सहा हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट झाले होते. डिसेंबरमध्येही हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त तीन हजार ५५२ आढळून आले, तर तीन हजार ३१२ मुक्त झाले, तर ६८ जणांचा मृत्यू झाला. जानेवारी महिन्यात तर १ हजार ४०२ रुग्ण आढळले, तर २६ जणांचा मृत्यू झाला, तर कोरोनामुक्तची संख्या ९७८ राहिली.
जानेवारीच्या मध्यापर्यंत तरी कोरोना नियंत्रणात होता. मात्र, त्यानंतर रुग्णांची संख्या वाढू लागली. फेब्रुवारी महिन्यात तर सतत बाधितांचा आकडा वाढू लागला. तसेच मृतांचीही संख्या वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत एक हजार ८३ रुग्ण आढळून आलेले आहेत, तर ९२४ जण मुक्त झाले आहेत. त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्या १५ दिवसांत १५ हजार ९३८ संशयितांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली. यावरून फेब्रुवारीपासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.
कोट :
कोरोना अजुन संपलेला नाही, तरीही अनेक नागरिक विनामास्क फिरतात. शासन नियमांचे पालन करत नाहीत. नागरिकांची ही भूमिका चुकीची आहे. शासन नियमांना कंटाळून चालणार नाही. आपण गाफील राहिलो तर कोरोना आणखी जवळ येईल. काळजी घेतली तर स्वत:सह इतरही सुरक्षित राहतील.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
.............................................................