कवठेमहांकाळमध्ये यंदाचा उन्हाळा सुखावणारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:00+5:302021-04-10T04:26:00+5:30
फोटो ओळी : बोरगाव (ता. कवठे महांकाळ) येथील तलावात सध्या पाणीसाठा शिल्लक असल्याने परिसरातील नागरिकांना याचा दिलासा मिळाला आहे. ...

कवठेमहांकाळमध्ये यंदाचा उन्हाळा सुखावणारा
फोटो ओळी : बोरगाव (ता. कवठे महांकाळ) येथील तलावात सध्या पाणीसाठा शिल्लक असल्याने परिसरातील नागरिकांना याचा दिलासा मिळाला आहे.
जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यात गतवर्षी मुबलक पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील सर्व बंधारे,
विहिरी, ओढे, नाले व तलावात चांगला पाणीसाठा निर्माण झाला होता. परिणामी, ऐन उन्हाळ्यातही दोन तलाव वगळता उर्वरित नऊ तलावात अद्याप पाणीसाठा चांगला टिकून आहे. त्यामुळे तलावांच्या लाभक्षेत्रातील ३९३२ हेक्टर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात नेहमीच उन्हाळ्यात शेती व पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न भेडसावत असतो. द्राक्ष पिकास तर विकतचे पाणी घ्यावे लागते; मात्र गेल्या वर्षी झालेल्या वरुणराजाच्या कृपेने तालुक्यात विहिरी, बंधारे, ओढे,
नाले व तलावात भरपूर पाणीसाठा झाला. त्यामुळे आपसुकच भूजल पातळीतही कमालीची वाढ झाली.
द्राक्ष व धान्य पिकांसाठी पाणीसाठा उपयुक्त ठरला. ही पिकेही पार पडली. तालुक्यात दहा लघु व एक मध्यम असे अकरा तलाव आहेत. पैकी सध्या लांडगेवाडी व हरोली या दोन तलावातील पाणी साठा कमी झाला आहे; मात्र उर्वरित तलावात चांगला पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे द्राक्ष व धान्य पिकासाठी पाणीसाठा उपयोगी पडेल व उन्हाळ्यात शेतीसाठीही या पाण्याचा लाभ होईल.
सध्या कवठेमहांकाळ तालुक्यातील तलावात उपलब्ध पाणीसाठा (द.ल.घ.फू.मध्ये) व तलावांचे सिंचन लाभक्षेत्र कंसात (हेक्टर मध्ये) पुढीलप्रमाणे कुची ३८.७५ (३९२),
रायवाडी ६७.५१ (३९६), लांडगेवाडी ०२.६९ (३३५), लंगरपेठ ३६.६० (२३५), नांगोळे १०.००- (१४८),
बोरगाव १२.७८ (२५२), हरोली ०७.१६ (१३१), दुधेभावी ८६.८६ (६९७), घोरपडी ३७.६१ (१९८), बंडगरवाडी १८.९१ (२८६), बसप्पावाडी २०२.३८ (८६२).
चौकट
तलावांची डागडुजी गरजेची
तालुक्यातील अकरा मोठे तलाव वगळता अनेक गावात बरेच इतरही काही छोटे-मोठे तलाव आहेत. तेही तलाव गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते; पण बऱ्याच वर्षांपासून या तलावांची कामे न केल्याने पाणी गळतीने ते आज कोरडे ठणठणीत पडले आहेत. याकडेही लक्ष देणे गरजेचे बनले आहे.