कासेगावात दारूबंदीसाठी नारीशक्ती सरसावली
By Admin | Updated: August 29, 2014 23:11 IST2014-08-29T21:39:47+5:302014-08-29T23:11:46+5:30
पडद्यामागून हालचाली : दारूबंदीच्या ठरावासाठी सरपंचांना निवेदन

कासेगावात दारूबंदीसाठी नारीशक्ती सरसावली
प्रताप बडेकर - कासेगाव -कासेगाव (ता. वाळवा) येथील कायमची दारूबंदी करण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. दारूबंदीचा ठराव घ्यावा याकरिता शेकडो महिलांच्या स्वाक्षरीचे निवेदन सरपंच नंदाताई पाटील यांना देण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे, तर विरोधी गट पडद्यामागून वेगवान हालचाली करत आहे.
कासेगाव येथे गेल्या कित्येक वर्षांपासून दारूबंदीसाठी प्रत्येक ग्रामसभेमध्ये विरोधी गटाकडून आवाज उठवला जात आहे. परंतु आजअखेर यावर सत्ताधारी गटाकडून फक्त आश्वासने दिली जात असल्याची तक्रार विरोधी गटाकडून केली जात आहे.
गेल्यावर्षी ग्रामसभेत दारूबंदीबाबत ज्येष्ठ नेते जनार्दनकाका पाटील यांनी सत्ताधारी गटाचे सचिन पाटील व विरोधी गटाचे पांडुरंग वाघमोडे यांना यामध्ये लक्ष घालावयाच्या सूचना केल्या होत्या. परंतु विरोधी गटाकडून कुणीही आमच्याशी चर्चा केली नसल्याची तक्रार सरपंच नंदाताई पाटील व सचिन पाटील यांनी केली आहे, तर दारूबंदीच्या ठरावाबाबत जाणून-बुजून सत्ताधारीच असमर्थता दाखवत असल्याचा थेट आरोप विरोधी गटाकडून होत आहे.
स्वातंत्र्यदिनी पार पडलेल्या ग्रामसभेतही या प्रश्नावर विरोधी गटाकडून आवाज उठवण्यात आला होता व दारूबंदीचा ठराव घ्या, अशी मागणी केली होती. परंतु सरपंचांनी त्याबाबत असमर्थता दर्शवत महिला जर यामध्ये सहभागी होत असतील व त्यांच्याकडून याबाबत निवेदन आले, तर त्याबाबत विचार करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया दिली होती.
या संधीचा फायदा घेत विरोधी गटातील पांडुरंग वाघमोडे, भीकशेठ तोडकर, शंकर बागल, विजय पाटील, जयप्रकाश रणदिवे, तानाजी गावडे, भीमराव माळी, जयदीप पाटील, सुरेश माने, राजेंद्र कराडे, दिनकर जाधव आदींनी महिलांच्या स्वाक्षरीचे दारूबंदीबाबत ठराव घ्यावा, अशा आशयाचे निवेदन सरपंचांना दिले आहे. त्यामुळे दारू बंदीबाबतच्या ठरावाचा चेंडू पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांच्या कोर्टात आला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी कोणती भूमिका घेतात, याची उत्सुकता ग्रामस्थांना लागली आहे.
सरपंचांनीच पुढाकार घ्यावा
सरपंच नंदाताई पाटील यांनीच या दारूबंदीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ग्रामसभेमध्ये विरोधी गटाकडून सातत्याने दारूबंदीसाठी प्रयत्न केले जात आहेत; मात्र त्याला सत्ताधाऱ्यांची साथ लाभत नसल्यानेच गावातील दारूबंदी होऊ शकलेली नाही. त्यामुळे सौ. पाटील यांनीच यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी महिला वर्गातून होत आहे.