नव्या दमाचे आम्ही कारभारी, वाजवू गावाच्या विकासाची तुतारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:14+5:302021-02-05T07:32:14+5:30
सांगली : तरुणांनी राजकारणात आले पाहिजे असे साळसुदपणे म्हणणारी ज्येष्ठ नेतेमंडळी प्रत्यक्ष तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा मात्र कंजूसपणा ...

नव्या दमाचे आम्ही कारभारी, वाजवू गावाच्या विकासाची तुतारी
सांगली : तरुणांनी राजकारणात आले पाहिजे असे साळसुदपणे म्हणणारी ज्येष्ठ नेतेमंडळी प्रत्यक्ष तिकीट देण्याची वेळ येते तेव्हा मात्र कंजूसपणा करतात. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र तरुणांनी मुसंडी मारली असून, २९० जणांनी गावकारभारी होण्याचा मान मिळविला आहे.
जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यात गावकारभारी होण्यासाठी ३७३ तरुणांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. त्यापैकी २९० जणांना मतदारांनी संधी दिली. जिल्ह्यात एकूण १५०८ नवे सदस्य निवडून गेले, त्यामध्ये हा टक्का अत्यल्प आहे. विशेष म्हणजे या २९० जणांमध्ये युवतींची संख्या जास्त आहे. शिवाय छोट्या गावांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे हेदेखील लक्षवेधी मानावे लागेल. मोठ्या गावांत ज्येष्ठांनीच सत्तेची सूत्रे हाती ठेवल्याचा हा परिणाम असावा.
या तरुण मंडळींची निवडणुकीची शपथपत्रे पाहिली असता शिक्षितांची संख्याही चांगली आहे. त्यांना अनुभव नसला तरी चांगले-वाईट नक्कीच समजते, त्यामुळे ते गावाच्या विकासाला दिशा देतील अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. निवडणुकीत पैसे, दारू वाटप न करता परिणामकारक प्रचार आणि लोकेच्छा यातूनच ही तरुणाई गावच्या राजकारणात उतरल्याचेही जाणवले. अनेक प्रस्थापित नेत्यांनी राजकारणाचा वारसा चालविण्यासाठीही आपल्या पुढील पिढीला रिंगणात उतरवून मैदान मारल्याचेही दिसते.
चौकट
मिरज तालुका अधिक तरुण
मिरज तालुक्यात तरुण कारभाऱ्यांची संख्या जास्त आहे. ८२ जणांनी मैदान लढविले होते, त्यातील ३५ जण यशस्वी झाले. जत व तासगावमध्येही नवतरुणांनी ग्रामपंचायतीत मोठ्या संख्येने एंट्री केली आहे. शिवाय पलूस व कवठेमहांकाळमध्येही लक्षणीय प्रमाण आहे.
चौकट
तरुणांचे व्हिजन दूरदर्शीपणाचे
सर्रास नवतरुण कारभाऱ्यांनी समाजकारणाचा वसा डोळ्यांसमोर ठेवल्याचे जाणवते. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, तरुणांसाठी पोलीस व सैन्य भरती मार्गदर्शन वर्ग, व्यायामशाळा, वाचनालय असे प्रकल्प त्यांच्या नजरेसमोर आहेत. त्यानंतर क्रम लागतो रस्ते, पाणी व अन्य मूलभूत समस्यांचा.
पॉईंटर्स
- निवडणुका झालेल्या ग्रामपंचायती १४३
- निवडून आलेले उमेदवार १५०८
- १८ ते ३२ वयोगटातील विजयी उमेदवार २९०
कोट
पहिल्याचवेळी निवडणूक लढविली आणि यशस्वीदेखील झाले. आता गावाच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर निश्चित केले आहे. पाणी, रस्ते हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ज्येष्ठांचा अनुभव आणि तरुणांचा उत्साह याचा मिलाफ साधून कामे करण्याचा प्रयत्न असेल.
- वासंती धेंडे, नवनिर्वाचित सदस्या, एरंडोली
कोट
शाळकरी वयापासूनच राजकारणाशी संबंधित आहे. कोलांचे प्रश्न जाणायचे तर ग्रामपंचायतीत उतरलेच पाहिजे या भावनेतून निवडणूक लढविली, यशस्वीही झालो. आता तरुणांचे प्रश्न सोडविणार आहे.
- सौरभ पाटील, नवनिर्वाचित सदस्य, कवलापूर
कोट
गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्याशिवाय रस्ते, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, पोलीस भरती मार्गदर्शन केंद्र असे तरुणांना उपयुक्त उपक्रम राबविणार आहोत.
- योगेश पाटील, कळंबी
--------