तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वाकुर्डे बुद्रुक पाणी योजनेचे पाणी २७ मार्च रोजी सांगली जिल्ह्यातील शेखरवाडीत पोहोचले. गावात आनंदाचे वातावरण होते, शेतकऱ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पाण्याचे पूजन झाले आणि ते निघून जाताच अवघ्या अर्ध्या तासात पाणीपुरवठा बंद झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
"मंगलप्रभात लोढांनी शपथेचा भंग केला, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा" अनिल परब आक्रमक
शेखरवाडीसाठी पाण्याचे पूजन झाल्यानंतर अर्ध्या तासातच पाण्याची धार आटली. जेव्हा संतप्त ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा धक्कादायक उत्तर मिळाले. "कार्वे गावातील काही शेतकऱ्यांनी पाईपलाईनचे व्हॉल्व उघडे केल्यामुळे पुढे पाणी पोहोचत नाही," असे कारण प्रशासनाकडून देण्यात आले. विशेष म्हणजे, "शेतकऱ्यांनीच व्हॉल्वजवळ जाऊन लक्ष ठेवावे," असा अजब सल्लाही अधिकाऱ्यांनी दिल्याने ग्रामस्थांच्या संतापात भर पडली.
"ही शासकीय योजना आहे की खाजगी? जर शासकीय योजना असेल तर तिची जबाबदारी प्रशासनाने का घेऊ नये?" असा संतप्त सवाल शेखरवाडीतील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. दुसऱ्या गावातील लोक व्हॉल्व उघडत असतील, तर त्यावर नियंत्रण मिळवणे हे पाटबंधारे विभागाचे काम आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेखरवाडी ग्रामस्थांनी तातडीने ग्रामपंचायतीत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.
या आहेत मागण्या
शेखरवाडीसाठी स्वतंत्र पाईपलाईन मंजूर करून नियमित पाणी द्यावे.
वारणा प्रकल्प आणि पाटबंधारे विभागाने या योजनेच्या अंमलबजावणीची सखोल चौकशी करावी.
पाणीपुरवठा प्रवाहात येणारे अडथळे दूर करून पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे.