विद्यापीठ उपकेंद्राबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:26+5:302021-06-30T04:17:26+5:30

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. हे उपकेंद्र भौगोलिकदृष्ट्या खानापूर ...

The university will discuss the sub-center with the Guardian Minister | विद्यापीठ उपकेंद्राबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

विद्यापीठ उपकेंद्राबाबत पालकमंत्र्यांशी चर्चा करणार

विटा : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे होण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली जाईल. हे उपकेंद्र भौगोलिकदृष्ट्या खानापूर येथेच होण्यासाठी ताकदीने आपली भूमिका मांडू, अशी ग्वाही शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांनी दिली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र तासगावऐवजी खानापूर येथे व्हावे, या मागणीसाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हा संघटक गोपीनाथ सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थी संघटना व सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सोमवारी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य धैर्यशील पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे स्थापन करावे, त्यासाठी विद्यापीठ स्तरावर पाठपुरावा करावा, अशी मागणी केली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी खानापूर उपकेंद्रासाठी दिलेले पत्र वैभव पाटील यांनी धैर्यशील पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी शिष्टमंडळाने शिवाजी विद्यापीठाच्या खानापूर येथे होणाऱ्या उपकेंद्रासाठी आजपर्यंत झालेले विविध ठराव व जागा पाहणीची माहिती दिली.

त्यावेळी धैर्यशील पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी खानापूर येथील जागा सोयीस्कर असेल, तर त्याबाबत विद्यापीठ प्रशासन खानापूरकरांच्या मागणीचा नक्कीच विचार करेल. याबाबत येत्या दोन दिवसांत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून आपली भूमिका मांडली जाईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी अक्षय भगत, दिगंबर गुरव, ऋषिकेश भगत, रोहित भगत, शंभूराजे भगत, रोहित जगताप, विशाल भगत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट :

शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरऐवजी तासगाव तालुक्यात होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे. मंत्री सामंत यांना या भागातील भौगोलिक स्थितीची माहिती नाही. त्यामुळे त्यांनी विद्यापीठ उपकेंद्र स्थापनेबाबत घेतलेला निर्णय दुर्दैवी आहे. त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा व विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करावे, अन्यथा राज्यपालांची भेट घेऊन न्यायालयात दाद मागू, असा इशारा यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने दिला.

फोटो : २९ विटा १

ओळ : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर करावे, यासाठी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली खानापूर तालुक्यातील शिष्टमंडळाने विद्यापीठ व्यवस्थापन समितीचे सदस्य ॲड. धैर्यशील पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली व मागणीचे निवेदन दिले.

Web Title: The university will discuss the sub-center with the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.