बायपास रस्त्यावर पोलिसांकडूनच वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:26 IST2021-04-10T04:26:47+5:302021-04-10T04:26:47+5:30
सांगली : येथील बायपास पूल आणि शिवशंभो चौकात वाहतूक पोलिसांकडूनच कागदपत्रे तपासणीसाठी वाहने अडविली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत ...

बायपास रस्त्यावर पोलिसांकडूनच वाहतुकीची कोंडी
सांगली : येथील बायपास पूल आणि शिवशंभो चौकात वाहतूक पोलिसांकडूनच कागदपत्रे तपासणीसाठी वाहने अडविली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. अडविलेली वाहने रस्त्यातच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. चारही बाजूंनी या चौकात मोठ्या प्रमाणावर वाहने येत असल्याने ही तपासणी अन्य ठिकाणी करावी, अशी मागणी शहरातील वाहनधारकांमधून केली जात आहे.
महापालिकेकडून तक्रारीकडे दुर्लक्ष
सांगली : तरुण भारत क्रीडांगण ते विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या मार्गाच्या वळणावर उघड्या चेंबरमुळे अपघात होत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी तक्रारी करूनही हे चेंबर बंदिस्त केले जात नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
राजापुरी हळदीला साडेतेरा हजार भाव
सांगली : सांगली मार्केट यार्डात शुक्रवारी ११ हजार ८०३ क्विंटल हळदीची आवक झाली होती. क्विंटल हळदीला जास्तीत जास्त १३ हजार ७०० रुपये तर हलक्या प्रतीच्या हळदीला सात हजार रुपये दर मिळाला आहे. सरासरी दहा हजार ३५० रुपये दर मिळाला आहे.
सांगलीत काकडी ५० रुपये किलो
सांगली : उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना आता पोटाला थंडावा देणाऱ्या काकडीला मागणी वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून भाव खाणारी काकडी आता ५० रुपये किलोने विकली जात आहे. काकडीची आवकही बाजारात वाढली आहे. तरीही मागणी अधिक असल्याने भाव वाढत आहेत.
ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित
सांगली : ऐन उन्हाळ्यात सांगली शहरात वीजपुरवठा खंडित होत आहे. शुक्रवारी वसंतदादा कारखाना परिसरातील उपनगरांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. कधी भर दुपारी, तर कधी मध्यरात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.