‘बाल विकास’च्या कारभारावर सदस्यांचे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:35+5:302020-12-11T04:54:35+5:30
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी प्रचंड ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. या विभागाच्या ...

‘बाल विकास’च्या कारभारावर सदस्यांचे ताशेरे
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या कारभारावर सर्व सदस्यांनी प्रचंड ताशेरे ओढत नाराजी व्यक्त केली. या विभागाच्या अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे सभागृहात वादंग माजले. दरम्यान, सभापती शुभांगी पाटील यांनी चौथी आणि सातवीच्या वर्गाच्या शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणेच सुरू कराव्यात, अशी मागणी केली.
पंचायत समितीच्या सभागृहात सभापती शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार यांच्या उपस्थितीत सभा झाली. यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरी आलेली सानिका निवास शिंदे (वाटेगाव) आणि बारावी आलेली आदिती विजय पाटील (ऐतवडे खुर्द) या मुलींचा सत्कार करण्यात आला. जागतिक पुरस्कार मिळविणारे सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले यांच्या अभिनंदनाचा ठराव रूपाली सपाटे यांनी मांडला.
सभेच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, पंचायत समिती आवारात होत असलेल्या पाण्याच्या नासाडीचा व्हिडीओ दाखवत प्रशासनाला जाब विचारला. आवारातीलच अशा महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील १०६ पैकी १०१ शाळा सुरू आहेत. वाहतूक व्यवस्थेला परवानगी नसल्याने ५ शाळा बंद आहेत. तालुक्यातील कामेरी १ व २, कासेगाव १ व २, बागणी १ व २ आणि महादेवनगर या जि. प. शाळा मॉडेल स्कूल म्हणून विकसित करणार असल्याचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. आरोग्याधिकाऱ्यांनी तालुक्यात २० कोरोनाचे रुग्ण उपचाराखाली असल्याचे सांगितले.
बावची आरोग्य केंद्रातील ५ आशा सेविकांची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकामच्या चर्चेवेळी शंकरराव चव्हाण यांनी, रस्त्याकडेच्या झाडीमुळे अपघात होतात, याकडे लक्ष वेधत, रस्ते सुविधा चांगल्या ठेवा, अशी सूचना केली. धनश्री माने यांनी, ऐतवडे बुद्रुक परिसरातील निकृष्ट रस्ते पुन्हा करण्याची मागणी केली. रूपाली सपाटे यांनी ताकारी-इस्लामपूरच्या, तर शुभांगी पाटील यांनी वाटेगाव परिसरातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला. सभेत देवराज पाटील, आनंदराव पाटील यांनीही प्रश्न उपस्थित केले.