चित्रपट, मालिकांमध्ये स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला गौणत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:35 IST2021-06-16T04:35:07+5:302021-06-16T04:35:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला आणि सौंदर्याला गौणत्व देऊन, तिचे शारीरिक सौंदर्य उत्तानपणे प्रेक्षकांपुढे वारंवार ...

चित्रपट, मालिकांमध्ये स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला गौणत्व
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : स्त्रीच्या बौद्धिक सामर्थ्याला आणि सौंदर्याला गौणत्व देऊन, तिचे शारीरिक सौंदर्य उत्तानपणे प्रेक्षकांपुढे वारंवार दाखवणारे सिनेमे आणि मालिका यांचा समाजमनावर अतिशय विपरीत परिणाम होतो. त्यातून स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारात भरच पडते, असे मत अमळनेरच्या साने गुरुजी स्मारक समितीच्या कार्यवाह आणि सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग व सोशल व्यवस्थापन विभाग यांच्यातर्फे आयोजित तीन दिवसीय व्याख्यानमालेतील, ‘गुंफू हातांमध्ये हात, फुलू सारे एक साथ’ या मुख्य विषयांतर्गत, ‘चित्रपट- मालिका व स्त्री प्रतिमा’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफताना दर्शना पवार बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, जाहिरातीतील वस्तूंचे मूल्य हे स्त्रीच्या आत्मसन्मानापेक्षा मोठे असत नाही. हतबल झालेली, सतत अन्याय सोसणारी, असहाय अशी स्त्रीदृष्ये अनेक चित्रपटात दाखवली जातात. पण त्यामुळे समाजातील प्रश्न सुटण्याऐवजी निर्ढावत जातात. स्त्री ही जन्मत:च सहनशील नसते. ते तिच्यावर लादले जाते.
कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमात स्वागतासाठी महिला, मुलींचा पुढाकार महत्त्वाचा मानला जातो. त्या कार्यक्रमातील विचार आणि त्याचा अंगीकार महत्त्वाचा असतो. मात्र हे लक्षात न घेता, वरवरच्या गोष्टींना महत्त्व दिले जाते. त्यातच वेळ, श्रम, पैसा खर्च होतो.
स्त्रीप्रश्नावर काम करणाऱ्या महिलांबाबत अनेक चित्रपटांमध्ये हेटाळणी, तिरस्कारयुक्त भूमिका असल्याचे दाखवले जाते. त्यामुळे वास्तवात काम करणाऱ्या स्त्रियांकडेही समाज त्या दृष्टीनेच बघतो. हे अत्यंत वेदनादायी आहे. त्यातून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचार वारशाला धक्का पोहोचवणारे आहे. स्त्रीने स्वत:चे निर्णय घेण्यासाठी, तिला कुटुंबीयांनी, समाजाने मोकळीक दिली पाहिजे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.