जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर संपला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:29 IST2021-04-09T04:29:00+5:302021-04-09T04:29:00+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर गुरुवारी संपुष्टात आला. जिल्हा परिषदेकडे ४६० आणि महापालिकेकडे ८७० डोस शिल्लक आहेत. ...

जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर संपला
सांगली : जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा अखेर गुरुवारी संपुष्टात आला. जिल्हा परिषदेकडे ४६० आणि महापालिकेकडे ८७० डोस शिल्लक आहेत. ते शुक्रवारी (दि. ९) सकाळी तासाभरातच संपतील, त्यानंतर नव्याने पुरवठा होईपर्यंत लसीकरण ठप्प राहणार आहे.
लसींचा तुटवडा मंगळवारपासूनच निर्माण झाला होता. बुधवारी व गुरुवारी उपलब्ध साठ्यानुसार लसीकरण झाले. सरकारी व खासगी अशा २२७ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, त्यातील १८५ केंद्रांवर गुरुवारी दुपारीच लस संपली, त्यामुळे लसीकरण थांबले. उर्वरित ४५ केंद्रांवर संध्याकाळपर्यंत साठा संपला. संध्याकाळी आरोग्य विभागाने सर्व उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सवरुन माहिती घेतली. त्यानुसार ग्रामीण भागात केवळ ४६० डोस शिल्लक आहेत. महापालिका केंद्रांवर सकाळी १६०० डोस शिल्लक होते. सध्या ८७० शिल्लक आहेत. शुक्रवारी सकाळी लस शिल्लक असणाऱ्या मोजक्या केंद्रांवर तासाभरातच ती संपणार आहे.
जिल्हा प्रशासनाने आणखी दोन लाख डोसची मागणी शासनाकडे केली आहे. राज्यातील लसीचा तुटवडा पाहता ती येण्यास किमान पाच दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लसीकरण पुढील आठवड्यातच सुरू होईल, असा अंदाज आहे. सध्या अनेक लाभार्थींना दुसरा डोस देण्याचे काम सुरू आहे. लसीअभावी त्यांचे लसीकरण आता होऊ शकणार नाही.
चौकट
लसीकरण असे
गुरुवारी ग्रामीण भागात २२६१, निमशहरी भागात ७४९, महापालिका क्षेत्रात १४१७ जणांचे लसीकरण झाले. जिल्हाभरात एकूण ४४२७ जणांना लस टोचण्यात आली. आजअखेर एकूण २ लाख ६८ हजार डोस देण्यात आले आहेत.
चौकट
गुरुवारचे नवे रुग्ण - ४०५
कोरोनामुक्त झालेले - २२३
दिवसभरातील मृत्यू - ५