कर्जमाफी वर्ग न केल्यास बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन : संदीप राजोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:24 IST2020-12-08T04:24:40+5:302020-12-08T04:24:40+5:30
भिलवडी : शासनाने सामूहिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या ...

कर्जमाफी वर्ग न केल्यास बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन : संदीप राजोबा
भिलवडी : शासनाने सामूहिक खाती असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफीची रक्कम बँकेने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी, अन्यथा जिल्हा बँकेच्या दारात ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला आहे.
ते म्हणाले की, महापुरामुळे व अतिवृष्टीमळे शेतीचे मोठे नुकसान होऊन शेतकरी उद्ध्वस्त झाला. तत्कालीन सरकारने नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून कर्जमाफीची घोषणा केली होती. सामूहिक खाती असणाऱ्या म्हणजे ज्यांची खातेफोड नसल्याने सर्व्हे व गट नंबर एकच असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता. जिल्हा बँक व विकास सोसायट्यांनी ‘कर्जमाफी हवी असेल तर व राज्य आणि केंद्र शासनाकडून चार टक्के व्याजमाफी हवी असेल, तर व्याजासह पीक कर्ज तात्काळ भरा’, असे सांगितले. शेतकऱ्यांनी कर्ज खाते थकीत जाऊ नये म्हणून उधार, उसनवार किंवा खासगी सावकारांकडून कर्ज काढून कर्जाची परतफेड केली. यानंतर बँकेने पीक कर्ज दिले. त्याच्या परतफेडीस अजून सात-आठ महिन्यांचा कालावधी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे पाठपुरावा करून सामूहिक खाती असणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून दिला. ही रक्कम शासनाने दिली आहे, पण बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना पूर्वसूचना न देता, त्यांची कोणतीही संमती न देता ही रक्कम पीक कर्ज व इतर कर्जास परस्पर जमा करून घेत आहेत. याबाबत बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील व व्यवस्थापकांना भेटणार आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर बँक पैसे जमा करीत नाही, तोपर्यंत जिल्हा बँकेच्या दारात स्वाभिमानी शेतकरी संघटना ठिय्या आंदोलन करणार आहोत.