अरुणअण्णांच्या विजयात शरद लाड किंगमेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:08+5:302020-12-11T04:54:08+5:30
अशुतोष कस्तुरे पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा गड सर करून अरुणअण्णा लाड आमदार झाले. या विजयाने जिल्ह्यात ...

अरुणअण्णांच्या विजयात शरद लाड किंगमेकर
अशुतोष कस्तुरे
पलूस : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचा गड सर करून अरुणअण्णा लाड आमदार झाले. या विजयाने जिल्ह्यात महाविकास आघाडीला बळ मिळाले आणि पलूस-कडेगाव मतदारसंघाचे राजकीय समीकरणच बदलून गेले. अण्णांच्या विजयात महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांचा जसा हात होता, तेवढेच त्यांचे चिरंजीव, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांचे मायक्रो प्लॅनिंगही अरुणअण्णांना आमदार करण्यात महत्त्वाचे ठरले.
पदवीधर निवडणुकीमध्ये प्रचाराची व्यूहरचना आखण्यापासून ते मनुष्यबळाचे योग्य नियोजन करण्यापर्यंतचे सर्व नियोजन शरद लाड यांनी केले. ते कुठेही प्रसिध्दीमध्ये दिसत नसले, तरी तेच या निवडणुकीत पडद्यामागचे खरे सूत्रधार होते. त्यांनी पाचही जिल्ह्यांतील राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्षांच्या प्रमुखांची भेट घेऊन अरुणअण्णांची भूमिका त्यांना पटवून दिली. स्थानिक नेतेमंडळींच्या साहाय्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला. यासाठी त्यांच्या मदतीला क्रांती उद्योग समूह, भारती विद्यापीठ, राजारामबापू उद्योग संकुल, प्रत्येक जिल्ह्यातील नेत्यांच्या संस्थांतील कार्यकर्ते होते. या सर्वांचे सारथ्य करताना शरद लाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोणत्याही घटकाची नाराजी न घेता प्रत्येक प्रश्न चोखंदळपणे मांडला.
मागील निवडणुकीतील अनुभवाच्या जोरावर शरद लाड यांनी मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येक घटकापर्यंत कार्यकर्त्यांना पाठविले. मतदान करून घेण्यापर्यंतचे जाळे त्यांनी तयार केले होते. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांमधील प्रमुख नेत्यांशीही त्यांनी तेवढाच संपर्क ठेवला होता. त्यांच्या मदतीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. शरद लाड यांनी या निवडणुकीमध्ये अर्जुनाचे सारथ्य जसे श्री कृष्णाने केले होते, तसे या निवडणुकीत शरद लाड यांनी सारथ्य करून विजयाची माळ आपल्या वडिलांच्या गळ्यात घातली. या विजयामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात महाविकास आघाडीची शक्ती वाढली आहे. कदम-लाड एकजुटीमुळे सर्व निवडणुका त्यांच्यासाठी सोप्या झाल्याचे सध्याचे चित्र दिसत आहे.
चौकट
लाड-कदम गटात गोडवा
पदवीधर संघाच्या निवडणुकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी चोख भूमिका बजावून पूर्वीपासून असलेली लाड आणि कदम गटातील दरी संपविण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यानिमित्ताने कदम-लाड गटात गोडवा निर्माण झाला आहे.