नवे उद्योग आणण्यासाठी आता मुंबईत ठाण मांडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST2020-12-11T04:54:04+5:302020-12-11T04:54:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, ...

Settle in Mumbai now to bring in new industries | नवे उद्योग आणण्यासाठी आता मुंबईत ठाण मांडा

नवे उद्योग आणण्यासाठी आता मुंबईत ठाण मांडा

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : अनेक वर्षांपासून पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या भाजपने पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा ते वाढविण्याचेच काम केले, अशी टीका जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी गुरुवारी सांगलीत केली. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

सकल जैन समाजातर्फे येथील राजमती भवनात सांगलीत पदवीधर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार अरुण लाड यांचा सत्कार मंत्री पाटील यांच्याहस्ते करण्यात आला. लाड व जयंत पाटील यांना यावेळी संस्कृतमधील मानपत्र प्रदान केले. यावेळी जयंत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, पदवीधरांचे शंभरहून अधिक प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी आता महाविकास आघाडीची आहे. पदवीधरांनी भाजप हा पक्ष नुकसान करणारा आहे, हे ओळखून त्यांनी लाड यांना निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी आता हे प्रश्न सोडविण्यासाठी सहा वर्षे पाठपुरावा करावा. शासनामार्फत आम्ही त्यासाठी ताकद लावू.

पदवीधरांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी एक संकेतस्थळ किंवा पोर्टल तयार करुन लाड यांनी प्रथम पदवीधरांच्या प्रश्नांची यादी तयार करावी. ते प्रश्न कोणत्या माध्यमातून सोडवायचे, याचा विचार केला जाईल. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात नवे उद्योग आणण्यासाठी लाड यांनी मुंबईच्या एमआयडीसीमध्ये ठाण मांडावे.

सुरेश पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, कर्नाटकात जितक्या सवलती जैन समाजाला मिळतात, तितक्या महाराष्ट्रात मिळत नाहीत. त्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. मुस्लिम समाजाला आरक्षण व सवलती देण्याचे आश्वासन शासनाने दिले आहे. त्याप्रमाणे अन्य अल्पसंख्याकांचेही प्रश्न सोडवावेत. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सुरेश बेदमुथा, संजय बजाज आदी उपस्थित होते.

चौकट

पाखरांपेक्षा निष्ठावंतांना किंमत द्या

सुरेश पाटील म्हणाले की, जिथे पीक येईल तिथे येणाऱ्या राजकीय पाखरांना त्यांची जागा दाखवून निष्ठावंतांना चांगली संधी द्यावी. असे झाले तर पक्षवाढीसाठी त्याचा फायदा होईल.

चौकट

वॉच ठेवायलाच हवा

पदवीधरच्या निवडणुकीत कोणी किती कष्ट केले, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यावेळी बजाज यांनी, लाड यांची माणसे तरीही आमच्यावर वॉच ठेवत होती, असे सांगितले. त्यावर जयंत पाटील म्हणाले की, तसा वॉच असायलाच पाहिजे. यावर उपस्थितांत हशा पिकला.

Web Title: Settle in Mumbai now to bring in new industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.