औद्योगिक च्या रस्त्यांचे भाग्य उजळल
By Admin | Updated: December 1, 2014 00:13 IST2014-11-30T22:25:46+5:302014-12-01T00:13:04+5:30
डांबरीकरण सुरू : उद्योजकांचा तीस वर्षांचा संघर्ष संपण्याची चिन्हे

औद्योगिक च्या रस्त्यांचे भाग्य उजळल
सांगली : महापालिकेला दरवर्षी अडीच ते तीन कोटी रुपयांचा महसूल देणाऱ्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांचे भाग्य अचानक उजळले आहे. गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेला पायाभूत सुविधांसाठीचा संघर्ष किमान काही प्रमाणात तरी संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहेत. महापालिकेने या ठिकाणच्या रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम गेल्या दोन दिवसांपासून सुरू केल्याने येथील उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.
खराब रस्ते, उघड्या गटारी यामुळे गेल्या तीस वर्षांपासून गैरसोयींच्या विळख्यात सापडलेल्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीचा वनवास संपणार कधी?, असा प्रश्न उपस्थित होत होता. शहरातील सर्वाधिक खराब रस्ते या औद्योगिक वसाहतीमध्ये आहेत. गेली तीस वर्षे येथील उद्योजक सुविधांसाठी धडपडत आहेत. पूर्वी जकातीच्या माध्यमातून दरवर्षी अडीच ते तीन कोटीचा महसूल वसंतदादा औद्योगिक वसाहतीमधून मिळत होता. आता एलबीटीचेही उत्पन्न तीन कोटीच्या घरात जाणार आहे. इतका कर भरूनही औद्योगिक वसाहतीस सुविधा पुरविण्यात येत नाहीत.
महापालिकेच्या अखत्यारीत सध्या वसंतदादा औद्योगिक वसाहत, मिरज एमआयडीसी आणि गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतींचा समावेश होतो. कुपवाड एमआयडीसीला औद्योगिक विकास महामंडळाचे छत्र लाभले आहे. त्यामुळे अन्य दोन वसाहती व एक एमआयडीसी वर्षानुवर्षे समस्यांना तोंड देत आहे. महापालिका क्षेत्रातील औद्योगिक वसाहतमध्ये रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्याने उद्योजकांमधून समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
उद्योजकांचा संघर्ष
शासन व महापालिकेस मोठ्या प्रमाणावर कर देऊनही, पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत, म्हणून उद्योजकांनी संघर्ष केला आहे. आता संपत चौक ते वसंतदादा कारखाना पिछाडीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे. टप्प्या-टप्प्याने अन्य रस्त्यांचेही डांबरीकरण करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेबरोबर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता नागरी सुविधाही पुरविण्यात येत आहेत.