बक्षीसपात्र गावांना उपक्रमाचा विसर!

By Admin | Updated: September 6, 2016 23:50 IST2016-09-06T23:09:16+5:302016-09-06T23:50:18+5:30

संख्या घटली : जिल्ह्यात १२५ गावातच ‘एक गणपती’

Prizes are forgotten by the villages! | बक्षीसपात्र गावांना उपक्रमाचा विसर!

बक्षीसपात्र गावांना उपक्रमाचा विसर!

सचिन लाड-- सांगली --जिल्हा प्रशासन व पोलिस यंत्रणा राबवित असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यावर्षी अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील ७१९ पैकी केवळ १२५ गावांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या उपक्रमाचा विसर पडल्याने, अशा गावांची संख्या घटल्याचे चित्र आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही गावे या उपक्रमात सहभागी झाली नाहीत.
गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आले, यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना राबविली जात आहे. तसेच पोलिस ठाण्यापासून अनेक गावे २५ ते ३० किलोमीटरवर आहेत. एखादा अनुचित प्रकार घडला, तर तिथे पोलिसांना पोहोचण्यास किमान अर्धा तास तरी लागतो. यासाठी पंधरा वर्षांपूर्वी जिल्हा प्रशासन व पोलिसांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम सुरु केला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छताअभियान व महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे उपक्रमातून बाहेर पडली असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गतवर्षी १४० गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गणपती’ बसविला होता.
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात जिल्ह्याने २००८-०९ मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी २००९ मध्ये २४५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसविण्यात आला होता. त्याच्या दुसऱ्यावर्षी २०१० मध्ये तर सुमारे ३०२ गावांत हा उपक्रम राबविण्यात आला होता. पण त्यानंतर मात्र ही संख्या घटतच गेली.

योजनेची आकडेवारी...
वर्ष गावे
२००५ : ७६
२००६ : ८५
२००७ : १४५
२००८ : ३३४
२००९ : २४५
२०१० : ३०२
२०११ : १९४
वर्ष गावे
२०१२ : २०५
२०१३ : १५१
२०१४ : १२४
२०१५ : ११०
२०१६ : १२५

Web Title: Prizes are forgotten by the villages!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.