सत्ताधाऱ्यांचा मोर्चा म्हणजे अजबच!
By Admin | Updated: August 26, 2015 23:03 IST2015-08-26T23:03:18+5:302015-08-26T23:03:18+5:30
पतंगराव कदम : दुष्काळाच्या प्रश्नाकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष

सत्ताधाऱ्यांचा मोर्चा म्हणजे अजबच!
सांगली : केवळ बनवाबनवी आणि फसवाफसवी झाल्याने लोकांमध्ये सरकारबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचाच मोर्चा म्हणजे अजबच प्रकार आहे, असे मत आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, शासनाने अनेक प्रकारच्या घोषणा केल्या. या घोषणांचा काहीही उपयोग झाला नाही. ‘अच्छे दिन की बुरे दिन’ हे आता लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लोकांची मानसिकता बदलली आहे. जशी मोदींची लाट आली होती, तशीच त्यांच्या विरोधातील लाट आता तयार होत आहे. राज्य करावे तर काँग्रेसनेच करावे, असे लोक आता म्हणत आहेत.
लोकांचा पूर्ण अपेक्षाभंग झाला आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या घटकपक्षांच्याही अडचणी वाढल्या आहेत. प्रत्येकालाच लाल दिव्याची गाडी हवी आहे. लोक आग्रही असूनही मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकलेला नाही. त्यामुळे राजकीय पातळीवरही सगळा आनंदच आहे.
दुष्काळाच्या प्रश्नाबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यात परिस्थिती गंभीर असतानाही, सरकार कोणत्याही उपाययोजना करीत नाही. आम्ही दिलेले स्थायी आदेशच पुढे रेटले असते, तरी दुष्काळी भागाला मदत झाली असती. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता, तातडीच्या उपाययोजनांची गरज आहे. (प्रतिनिधी)
दोनच मते विरोधात
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारी व हमालांनीही सत्ताधारी गटाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता केवळ दोनच मते विरोधात आहेत. आधुनिकीकरण तसेच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सर्व नवे चेहरे असल्यामुळे स्वच्छ व पारदर्शी कारभार होईल, याची खात्री त्यांनी व्यक्त केली.