पतंगराव, विश्वजित यांचा लोकसभेसाठी शड्डू--कारण -राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:52 PM2018-01-09T23:52:10+5:302018-01-09T23:53:33+5:30

काँग्रेसचे ‘हेवीवेट नेते’ म्हणून राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले पतंगराव कदम आणि त्यांचे चिरंजीव विश्वजित आता सांगलीतून लोकसभेसाठी शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत.

Patangrao, Vishwajit's Shuddu for the Lok Sabha - Reason - Reason | पतंगराव, विश्वजित यांचा लोकसभेसाठी शड्डू--कारण -राजकारण

पतंगराव, विश्वजित यांचा लोकसभेसाठी शड्डू--कारण -राजकारण

googlenewsNext

-- श्रीनिवास नागे-

काँग्रेसचे ‘हेवीवेट नेते’ म्हणून राज्याच्या राजकारणात दबदबा असलेले पतंगराव कदम आणि त्यांचे चिरंजीव विश्वजित आता सांगलीतून लोकसभेसाठी शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. दिल्लीत जाण्याचे संकेत देऊन त्यांनी चाचपणीही सुरू केली आहे. मागील निवडणुकीवेळीच पतंगरावांनी विधानसभेची आपली शेवटची लढत असल्याचे सांगितले होते.
त्यावेळी पलूस-कडेगाव मतदारसंघाला भावनिक साद घातली होती. त्यानंतर त्यांनी ‘स्वत: किंवा विश्वजित’, असे गणित बांधून आस्ते कदम लोकसभेची तयारी सुरू केली होती.


सांगली लोकसभेची जागा मागील वेळी पहिल्यांदाच काँग्रेसच्या हातातून गेली. या जागेवर आतापर्यंत अगदी सुरुवातीला वसंतदादा पाटील सांगतील त्याला आणि नंतर मात्र त्यांच्या घरातच काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. १९८०-८५ नंतर पतंगराव कदम यांनीही काँग्रेसमध्ये स्वत:ची ताकद निर्माण केली. सांगली जिल्ह्यावर त्यांची पकड तयार झाली, पण काँग्रेसने लोकसभेसाठी दोनदा त्यांच्या घराण्याला हुलकावणी दिली. वसंतदादांचे चिरंजीव खासदार प्रकाशबापू यांच्या आकस्मिक निधनानंतर पतंगरावांनी ज्येष्ठ बंधू मोहनराव कदम यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. अगदी शक्तिप्रदर्शनासाठी मांडवही टाकला, पण ‘हायकमांड’ने प्रकाशबापूंचे चिरंजीव प्रतीक यांना तिकीट दिले. नंतर जेव्हा पतंगरावांचे चिरंजीव विश्वजित यांनी जिल्ह्याच्या राजकारणात बांधणी केली, तेव्हा पतंगरावांनी त्यांच्यासाठी जोरदार ‘फिल्डिंग’ लावून लोकसभेची उमेदवारी मागितली, पण तेव्हाही दिल्लीने दगा दिला. त्यामागे त्यांचे पंख छाटण्याचा काहींचा डाव होता. पात्रता, ताकद, ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असतानाही आपल्याला डावलल्याबद्दल त्यावेळी पतंगरावांनी दिल्लीतून सांगलीत येऊन प्रसारमाध्यमांपुढे संताप व्यक्त केला होता.

मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. विश्वजित कदम युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. मागील लोकसभा निवडणुकीत पतंगरावांनी विश्वजित यांच्यासाठी पुण्यातून उमेदवारी मिळवली, पण मोदी लाटेत पदरी पराभव पडला. असे असले तरी विश्वजित सध्या काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ‘गुड बुक’मध्ये आहेत. सांगली लोकसभेची जागा भाजपने तब्बल अडीच लाखाच्या मताधिक्याने पटकावली आहे, एकेकाळी काँग्रेसमध्ये असणारे संजयकाका पाटील भाजपचे खासदार आहेत. वसंतदादा घराण्याच्या हालचाली मंदावल्या आहेत. वसंतदादांच्या जन्मशताब्दी वर्षातच या घराण्याच्या ताब्यात असलेला वसंतदादा साखर कारखाना खासगी संस्थेला चालविण्यास देण्याची नामुष्की ओढवली आहे. जिल्ह्याने ज्यांना वसंतदादांच्या पुण्याईवर खासदारकी दिली, ते माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील अजिबात सक्रिय नाहीत. गेल्यावेळी त्यांना फटका बसण्यामागे निष्क्रियता हाही मुद्दा होता. मात्र त्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत बदल झालेला नाही. कदाचित भाजपला पूर्ण ओहोटी लागण्याची आणि पुन्हा एकदा आयती खासदारकी मिळण्याची ते वाट पाहत असावेत!

या पार्श्वभूमीवर पतंगरावांनी विधानपरिषदेत मोहनराव कदम यांना एकहाती विजय मिळवून दिला. जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि गुजरातेतील विधानसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट झाली, तर काँग्रेसने मुसंडी मारली. आता हीच सुवर्णसंधी पतंगरावांना खुणावत असावी. यातूनच त्यांच्या हालचालींना बळ मिळाले आहे. विरोधातील उमेदवाराच्या तुलनेत त्यांची ‘पॉवर’ अंमळ जादाच दिसेल, हे सारा जिल्हा जाणतो. संस्थात्मक काम आणि मंत्री-पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी खेचून आणलेली कामे-निधी ही त्यांची आणखी जमेची बाजू. विश्वजित यांनीही युवक काँग्रेसच्या माध्यमातून तरुणांचे संघटन केले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील आठही विधानसभा मतदारसंघांत पतंगरावांनी स्वत:च्या गटाची मजबूत बांधणी सुरू केली आहे. शिवाय काँग्रेसमधील सर्व गटातटांना आणि इतर पक्षांतील मित्रांनाही आपलेसे करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसमधील दिवंगत मदन पाटील यांचा गट त्यांच्यासोबत असल्याचे दिसत आहे, मात्र प्रतीक आणि विशाल पाटील गटाने पत्ते खुले केलेले नाहीत. यातील पतंगरावांचे यशापयश तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकीत दिसणार आहे. त्यांच्यासाठी ती ‘लिटमस टेस्ट’ असेल.

जिल्ह्यातील राष्टÑवादीची सगळी सूत्रे आ. जयंत पाटील यांच्या हातात एकवटली आहेत. त्यांचे आणि पतंगरावांचे ‘अंडरस्टँडिंग’ जगजाहीर आहे, शिवाय काही दिवसांपूर्वी सांगलीच्या दौºयावर आलेल्या शरद पवारांशी दीर्घ चर्चा करून, त्यांच्यासोबत बारामतीला जाऊन पतंगरावांनी योग्य तो ‘मेसेज’ दिला आहेच.
जाता-जाता : सोमवारी विट्यात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या सत्कारावेळी पतंगरावांचे ज्येष्ठ बंधू आ. मोहनराव कदम आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे चुलतबंधू जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख एकत्र आले होते. त्यावेळी संग्रामसिंहांनी, ‘मोहनशेठ खासदार झाल्यास आमची हरकत नाही’, असे सांगून वात लावली आहे. त्यामागे संजयकाकांना विरोध की खरेच विकासासाठी मैत्रीचा हात, हे गुपीत लवकरच उघड होईल...

भाजपच्या तंबूत काय होणार?
पतंगरावांच्या तयारीच्या हालचाली भाजपच्या तंबूपर्यंतही पोहोचल्या आहेत. तेथे आधीच जुन्या-नव्यांचे गट-उपगट आहेत. खासदार संजयकाकांनी सर्वांशी जुळवून घ्यायचा प्रयत्न सुरू ठेवला असला तरी, जुन्या भाजपेयींशी अजून मने जुळलेली नाहीत. त्यात संजयकाका आणि जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात उभा दावा आहे. त्यातून देशमुखांनी काकांचा पत्ता कापण्याचा चंग बांधला आहे, मात्र भाजपकडे संजयकाकांशिवाय दुसरा समर्थ पर्यायही नाही! काकांना थांबवायचे तर खुद्द पृथ्वीराज देशमुखांनाच मुंडावळ्या बांधाव्या लागतील. अर्थात जिल्हाभरात त्यांच्याबाबतची स्वीकारार्हता काकांच्या तुलनेत खूपच कमी आहे, हा मुद्दा चर्चेला येईलच...

लोकसभा की विधानसभा?
पतंगराव लोकसभेसाठी उतरले तर पलूस-कडेगाव विधानसभेसाठी विश्वजित यांना उतरवणार की, स्वत: विधानसभेसाठी थांबून विश्वजित यांच्यासाठी लोकसभेचे तिकीट मिळवणार, हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरित आहे.

 

Web Title: Patangrao, Vishwajit's Shuddu for the Lok Sabha - Reason - Reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.