जिल्ह्यात शंभर गावांत ‘एक गाव एक गणपती’

By Admin | Updated: August 29, 2014 23:13 IST2014-08-29T23:02:00+5:302014-08-29T23:13:53+5:30

जोर ओसरला : बक्षीस मिळाल्यानंतर संकल्पनेचा विसर

One village one 'Ganapati' in 100 villages | जिल्ह्यात शंभर गावांत ‘एक गाव एक गणपती’

जिल्ह्यात शंभर गावांत ‘एक गाव एक गणपती’

सचिन लाड -सांगली -पोलीस आणि प्रशासन राबवत असलेल्या ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेचा जोर गतवर्षीपासून ओसरला आहे. यावर्षी जिल्ह्यातील १०० गावातील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावांना या संकल्पनेचा विसर पडला असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
गावातील सार्वजनिक गणेशोत्सवावरील खर्च कमी व्हावा, लोकवर्गणीचा विनियोग समाजहितासाठी व्हावा, गावातील तंटे कमी व्हावेत, मंडळांच्या कार्यकर्त्यांतील स्पर्धा संपावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ची संकल्पना मांडण्यात आली. या विधायक उपक्रमात सहभागी होणाऱ्या गावांची संख्या सध्या वाढत आहे. जिल्ह्यात ७०५ गावे असून, २५ लाखांहून अधिक लोकसंख्या आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अत्यंत अपुरी आहे. जिल्ह्यात २३ पोलीस ठाणी असून, पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अनेक गावे वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहेत. एखादी घटना घडली, तर तिथे पोहोचण्यासाठी पोलिसांना किमान अर्धा तास लागतो. गणेशोत्सवात तर कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी घटना घडू शकते. गावपातळीवरील अनेक गावात गट-तट आहेत. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सव साजरा करण्यासाठी स्पर्धा असते. यातून मग वाद उफाळून संघर्ष व मारामारीचे प्रकार घडतात. यामुळे पोलिसांना चोवीस तास पहारा द्यावा लागतो.
बारा वर्षापूर्वी जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यास सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीसप्रमुखांनी प्रत्येक गावातील सरपंच व गणेश मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक घेतली. ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेची माहिती सांगून त्यानुसार गावात अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला या संकल्पनेला कमी प्रतिसाद मिळाला. परंतु पोलीस व प्रशासनाने हार मानली नाही. मंडळांच्या कार्यकर्त्यांची पुन्हा बैठक आयोजित करुन त्यांच्यातील वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
बक्षिसानंतर गावे पडली प्रवाहातून बाहेर
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून गाव स्वच्छ ठेवून राज्यात पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या गावास २५ लाखाचे बक्षीस दिले जाते. हे बक्षीस मिळविण्यासाठी गावा-गावात स्पर्धा असते. त्यात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेसही काही गुण आहेत. त्यानंतर सात वर्षापूर्वी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरु झाले. या अभियानात सहभागी झालेल्या गावांनी गावात तंटाच नको म्हणून ‘एक गाव एक गणपती’चा स्वीकार केला. मात्र या दोन्ही अभियानांच्या माध्यमातून बक्षीस मिळविल्यानंतर या गावांना संकल्पनेचा विसर पडला आहे.

Web Title: One village one 'Ganapati' in 100 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.