सख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:34 IST2021-04-30T18:27:45+5:302021-04-30T18:34:11+5:30
Accident Mahavitran Shirala sangli : पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.

सख्या चुलत भावांचा पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू
विकास शहा
शिराळा : पाडळी ( ता. शिराळा ) येथील सख्या चुलत भावांचा विद्युत मोटार चालू करताना पाण्यात विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज शुक्रवार रोजी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास मोरणा धरण लगत पाडळी गावाच्या हद्दीत घडली. विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील (वय ३२) व मानसिंग बबन पाटील (वय ३०) असे या युवकांची नावे आहेत. या घटनेमुळे वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालयावर गावकऱ्यांनी मोर्चा नेला होता. या दोन युवक शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, विक्रम उर्फ जयकर सर्जेराव पाटील व मानसिंग बबन पाटील हे दोघे सकाळी ८ वाजणेच्या सुमारास पाडळीच्या लातोंडी नामक परिसरात असणाऱ्या शेती पाण्याच्या मोटारीकडे गेले असता त्यांना या विद्युत मोटारीचा विजेचा धक्का लागला. हा धक्का इतक्या मोठ्या प्रमाणात बसला की हे दोघे जागीच मृत्यू पावले. तेथे असणाऱ्या नागरिकांनी त्यांना पाण्याबरोबर काढून तातडीने मोटारसायकलवरून शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.
मानसिंग हे शिराळा येथील खाजगी कारखान्यात नोकरीस होते. ते अविवाहित असून त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे तर विक्रम उर्फ जयकर हे मुंबई येथे खाजगी नोकरीत होते. याच्या पश्चात पत्नी, लहान मुलगा, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. याबाबत सुनील बबन पाटील यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुमार वायदंडे हे करीत आहेत.
उपअभियंता प्रल्हाद बुचडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नक्की काय घटना घडली याची माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयास कळवले.यानंतर वरिष्ठ कार्यालयातील तज्ञ तसेच अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
विक्रम उर्फ जयकर पाटील हे मुंबईत खाजगी नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे चार- पाच दिवसांपूर्वीच ते पाडळी येथे सहकुटुंब गावाकडे आले होते.घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गावकरी वीज वितरण कंपनीच्या शिराळा कार्यालय येथे जमले आणि तक्रार करूनही वेळेत वीज मोटार कनेक्शनची दुरुस्ती केली जात नाही. यामुळे या दोघांना आपले प्राण गमवावे लागले, जो पर्यंत याबाबत ठोस कारवाई केली जात नाही, तोपर्यंत शवविच्छेदन करून देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता .