सोशल मीडियाचा गैरवापर नको
By Admin | Updated: August 29, 2014 23:13 IST2014-08-29T23:05:55+5:302014-08-29T23:13:35+5:30
दिलीप सावंत : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना इशारा

सोशल मीडियाचा गैरवापर नको
सांगली : सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. यातून त्यांच्याकडून सोशल मीडियाचा वापर होत आहे. मात्र याचा गैरवापर करुन कायद्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दिला. अशा स्वरुपाचा गुन्हा दाखल झाल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, सोशल मीडियाचा वापर करताना धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र, व्हिडीओ क्लिप्स, मॉर्फ (मूळ छायाचित्रात बदल) केलेले अश्लील छायाचित्र तयार करुन ते पोस्ट करणे, लाईक करणे, शेअर करणे, प्रसारित करणे हे कायद्याने गुन्हा आहे. असे केल्याचे कोणी आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) (ब), माहिती व तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ अन्वये गुन्हा दाखल केला जाईल. या गुन्ह्यात सात वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. संशयिताला शिक्षा तर होतेच, मात्र दोन समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यातून दंगल निर्माण झाली तर समाजाची जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणात होते.
ते म्हणाले, अशा प्रकारच्या समाजविघातक गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून व्हॉटस् अॅप, फेसबुक यु ट्यूब, गुगल प्लस, टिष्ट्वटर, लिंक्डईन आदी सोशल मीडियाचा वापर करताना विशेष दक्षता घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)