महापौर पदासाठी वाढणार चुरस...
By Admin | Updated: November 30, 2015 01:14 IST2015-11-30T00:04:23+5:302015-11-30T01:14:32+5:30
इच्छुक सरसावले : गटा-गटात नगरसेवकांची विभागणी, नेत्यांकडे ‘फिल्डिंग’ सुरू

महापौर पदासाठी वाढणार चुरस...
सांगली : महापालिकेच्या महापौर पदाचे डोहाळे लागलेल्या इच्छुकांनी आतापासूनच ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरूवात केली आहे. नगरसेवकांना आपल्या तंबूत खेचण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यातून पालिकेत गटा-तटाच्या राजकारणाने डोके वर काढले आहे. एकीकडे नगरसेवकांना प्रलोभने दाखविली जात असताना, नेत्यांकडून आपल्याच नावावर शिक्कामोर्तब व्हावा, यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे. विद्यमान महापौर विवेक कांबळे यांची फेब्रुवारी महिन्यात मुदत संपणार आहे. महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. तरीही आतापासूनच इच्छुकांची तयारी सुरू झाली आहे. महापालिकेत काँग्रेसची सत्ता असून त्यांच्याकडे ४२ नगरसेवक आहेत. पण काँग्रेसचे नेते मदन पाटील यांच्या निधनाने पालिकेतील सत्तासमीकरणाची दिशा हळूहळू बदलू लागल्याचे दिसून येते. पूर्वी मदनभाऊंचा शब्द अंतिम मानणारे नगरसेवक आता मात्र मोकाट सुटले आहेत. सत्ताधाऱ्यांत कुणाचा पायपोस कुणाला नाही. काँग्रेसचे दुसरे नेते आमदार पतंगराव कदम यांना मानणारा एक गट असला तरी, त्यांची ताकद कुणाच्या बाजूने राहणार, हेही पाहणे रंजक आहे. सध्या तरी पालिकेतील काँग्रेसचे बहुतांश नगरसेवक मदनभाऊंच्या पत्नी जयश्रीतार्इंचा शब्द मानणार, असे जाहीरपणे सांगतात. पण ऐनवेळी त्यातील काही नगरसेवक वेगळी भूमिका घेण्यासही मागेपुढे पाहणार नाहीत. त्यात पालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानी आघाडीतील ४२ नगरसेवकांनी एकत्रित येत दबाव गट निर्माण केला आहे. हा गट महापौर पदाच्या निवडणुकीची प्रतीक्षा करीत आहेत. त्यातील काहीजण तर उघडरित्या तडजोडीच्या गोष्टी करू लागले आहेत. सध्या तरी दबाव गटाने शहराचा विकास हाच अजेंडा डोळ्यासमोर ठेवला असला तरी, या गटातील काहीजण मात्र अर्थपूर्ण तडजोडीत तरबेज आहेत. त्यांच्या प्रलोभनाला कितीजण बळी पडतात?, पक्ष, नेत्यांचे आदेश मानणार का? असे अनेक प्रश्न निवडणुकीच्या तोंडावर समोर येणार आहेत.
महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आता सदस्यांची खेचाखेची सुरू केली आहे. आपल्याकडे किती नगरसेवक आहेत, हेच नेत्यांना दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून सत्ताधारी गटात गटा-तटाच्या राजकारणाने जोर धरला आहे. आमका या गटाचा, तमका त्या गटाचा, अशी चर्चाही रंगली आहे. नेत्यांनीही आपल्याच नावावर शिक्कामोर्तब करावे, यासाठी इच्छुकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी नेत्यांच्या मागे-पुढे करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. पुढीलवर्षी होणाऱ्या महापौर पदाची रंगीत तालीम सुरू आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीची भूमिका निर्णायक
महापौर निवडीवेळी सत्ताधारी काँग्रेसमध्ये फाटाफुट निश्चित मानली जात आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत वेगळा प्रयोग राबविण्याचा प्रयत्न झाला. पण राष्ट्रवादीने काँग्रेसला छुपी मदत करण्याची हमी दिल्याने हा डाव फसला होता. पण महापौरपदासाठीचे इच्छुक यंदा मात्र थांबण्याच्या मुडमध्ये नाहीत. काँग्रेसमध्ये फूट पडली तर, मदनभाऊ गटाला सत्ता टिकविण्यासाठी प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसची मदत घ्यावी लागेल. मदनभाऊ हयात असताना त्यांचे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्याशी सूत जुळले होते. हाच धागा पकडून मदनभाऊ गटाचे नगरसेवक सत्ता कायम राहील, अशी आशा बाळगून आहेत.
नायकवडी गट काय करणार?
महापालिकेत इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा एक गट कार्यरत आहे. या गटाने मागासवर्गीय समिती सभापती निवडीवेळी ताकद दाखविली होती. आता महापौरपदाच्या निवडणुकीत या गटाची डोकेदुखी होणार, हे स्पष्ट आहे. नायकवडी गटही मॅजिक फिगर गाठण्याचा प्रयत्न करणार. संख्याबळाची जुळवाजुळव झाल्यास हा गटही चमत्कार करू शकतो.