मदनभाऊंचा कॉँग्रेसशी दुरावा की फारकत?
By Admin | Updated: August 26, 2015 23:05 IST2015-08-26T23:05:32+5:302015-08-26T23:05:32+5:30
पक्षीय कार्यक्रमांना गैरहजेरी : आंदोलन, मेळाव्याकडे नगरसेवक, भाऊसमर्थकांची पाठ चर्चेचा विषय

मदनभाऊंचा कॉँग्रेसशी दुरावा की फारकत?
सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसविरोधात लढणारे मदन पाटील यांची पक्षीय कार्यक्रमांपासून दूर राहण्याची कृतीही काँग्रेसच्या नेत्यांना खटकू लागली आहे. केवळ मदन पाटीलच नव्हे, तर त्यांचे सर्व नगरसेवक, समर्थक कार्यकर्ते बुधवारी झालेला काँग्रेसचा मेळावा व आंदोलनापासून दूर राहिले. पक्षापासून फारकत घेण्याचे संकेतच यातून मिळत असल्याची भावना आता काँग्रेसच्या कट्टर कार्यकर्त्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत मदन पाटील यांनी जयंत पाटील व भाजपच्या काही नेत्यांशी जुळवून घेत वेगळे पॅनेल केले होते. काँग्रेसने उर्वरित नाराजांना एकत्रित घेऊन लढत दिली. काँग्रेसच्या नेत्यांविरोधात मदन पाटील लढत असल्याचे चित्र यानिमित्ताने निर्माण झाले. सहकारी संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाचा काही संबंध नसतो, असे मत मदन पाटील यांनीच जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी व्यक्त केले होते. पक्ष सोडला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र पक्षीय बैठका, कार्यक्रमांनाही मदनभाऊंनी गैरहजेरी लावल्यामुळे, सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे पडसाद आता पक्षीय पातळीवरही उमटू लागल्याचे दिसत आहे. बुधवारी होणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनाची, तसेच मेळाव्याची माहिती मदनभाऊंना देण्यात आली होती. मदनभाऊंनी मेळाव्याला उपस्थित रहावे, अशी आग्रही मागणीही करण्यात आली होती. मात्र, मदन पाटील यांच्यासह त्यांचा पूर्ण गटही गैरहजर राहिला. पक्षातील काही नेत्यांनी मदनभाऊंपेक्षा त्यांचा गटही न आल्याने आश्चर्य व्यक्त केले. पक्षापासूनच्या फारकतीचे हे संकेतच मानले जात आहेत. मदन पाटील यांनी आजवर कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील भूमिकेविषयी किंवा पक्षीय कार्यक्रमांपासूनच्या अलिप्तपणाबद्दल वक्तव्य केले नाही. तरीही त्यांच्या या सर्व कृतीमागे काही तरी गणित असल्याचे मत काँग्रेसच्या दुसऱ्या गटातून व्यक्त केले जात आहे.
काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला आणि मेळाव्याला पतंगराव कदम गटातील दोन नगरसेवक आणि काही नगरसेविका उपस्थित होत्या. अन्य नगरसेवकांनी या आंदोलनाकडे आणि कार्यक्रमाकडे का पाठ फिरविली, याबद्दल तर्कवितर्क केले जात आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून दादा गटातही वाद निर्माण झाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी कदम गटाशी सूर जुळवून काँग्रेसच्या मुख्य प्रवाहातच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे प्रसंगी त्यांनी मदन पाटील यांच्या विरोधातही प्रचार केला. दादा घराण्यातील या संघर्षाची व वेगवेगळ्या भूमिकांची चर्चा अजून राजकीय गोटात सुरू आहे.
मदनभाऊंच्या ताकदीची कल्पना
मदन पाटील यांच्या गटाची महापालिका क्षेत्रातील ताकद मोठी आहे. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी याबाबतची कबुलीही बुधवारी दिली. मदनभाऊ समर्थकांच्या गैरहजेरीमुळे मेळावा व आंदोलनासाठी अपेक्षित गर्दी होऊ शकली नाही. मदन पाटील यांची ही राजकीय ताकद कोणीही दुर्लक्षित केलेली नाही. त्यामुळेच त्यांच्या गटाची अनुपस्थिती चर्चेचा विषय बनली आहे.
महापालिकेतही ‘घडलंय-बिघडलंय’
काँग्रेसअंतर्गत महापालिकेतही दोन गट अस्तित्वात आहेत. पतंगराव कदम यांनी अनेकदा महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सदस्य निवडीच्या प्रक्रियेत मात्र, कदम गटाला एक जागा देण्यात आल्याने कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाली होती, तरीही महापालिकेत ‘घडलंय-बिघडलंय’चा प्रयोग वारंवार पाहावयास मिळतो.