वाढत्या तापमानाने पानमळे धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:27 IST2021-04-22T04:27:12+5:302021-04-22T04:27:12+5:30
नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून ...

वाढत्या तापमानाने पानमळे धोक्यात
नरवाड : लाखो लोकांचे जीवनमान अवलंबून असलेल्या पान उत्पादकांच्या पानवेली वाढत्या उन्हाच्या झळांमुळे होरपळू लागल्या आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढता राहिल्याने पानवेलींचे शेंडे व पाने काळी पडून करपू लागली आहेत. याशिवाय पानांच्या फुटव्यांवरही परिणाम झाला आहे. किमान २१ दिवसांनी येणारा पानवेलीचा खुडा महिन्यावर जाऊन पोहोचला आहे.
पानवेल ही एक संवेदनशील वनस्पती असून, पानांवर हवामानातील बदलाचा सतत परिणाम जाणवत असतो.
पावसाळ्यात पाणी जास्त झाल्यास पानगळ होऊन मूळकुजव्या येतो. थंडीत पानांचा फुटवा बंद पडतो. उन्हाळ्यात मात्र उन्हाचा झळांमुळे पानवेल करपून पाने काळी पडतात.
साधारणपणे पानवेली २५ ते ३० अंशांपर्यंत तग धरून राहतात. मात्र सध्या स्थिती पाहता उन्हाचा पारा ४१ अंशांपर्यंत जाऊ लागल्याने पाने करपू लागली आहेत. यामुळे हजारो रुपयांचे नुकसान पान उत्पादकांना सोसावे लागत आहे.
दरम्यान, करपलेल्या खाऊच्या पानांना पानबाजारपेठेत कवडीमोल किमतीला मागणी होत आहे. उन्हाचा पारा असाच वाढत राहिला तर पानवेलीची बुंध्यालगतची गोलाकार कडी वाळून पानवेल कोमेजणार आहे.
सांगली जिल्ह्यात २२४ हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड केली आहे. यापैकी मिरज तालुक्यातील १९८ हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक नरवाडला ८० हेक्टर क्षेत्रावर पानवेलींची लागवड झाली आहे. या सर्व क्षेत्रापैकी उन्हांमुळे किती क्षेत्र तग धरून राहते हे आता काळच ठरविणार आहे.
याबाबत पान उत्पादक शेतकरी मधुकर जाधव यांना विचारले असता, दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच चालल्याने पानमळ्यांचे भवितव्य धोक्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
चाैकट
हीे काळजी घ्या
उन्हाळ्यात पानमळ्याला पाणी शक्यतो
वाफ्याने चार दिवसांच्या अंतराने द्यावे. पानमळ्याला उन्हाच्या झळांपासून
संरक्षण मिळण्यासाठी शेडनेटच्या तटबंदी ऐवजी उसाचा पाला वापरावा. उन्हाळ्यात रसायनांचा वापर अजिबात करू नये. पानवेलींचे संतुलित तापमान ठेवण्यासाठी किमान उन्हाळ्यापुरते तुषार सिंचनाचा वापर करावा, अशी माहिती मिरज कृषी विभागाचे कृषी सहायक राजू रजपूत यांनी दिली.