कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प एक तप कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:30 IST2021-09-12T04:30:04+5:302021-09-12T04:30:04+5:30
अलीकडे महापुरामुळे सांगलीसह सगळ्या कृष्णा काठावरील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. यावर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीभागाला ...

कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प एक तप कागदावरच
अलीकडे महापुरामुळे सांगलीसह सगळ्या कृष्णा काठावरील जनजीवन वारंवार विस्कळीत होत आहे. यावर सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळीभागाला वरदान ठरणारा आणि कृष्णाकाठ वाचविण्याची क्षमता असणाऱ्या कृष्णा-माणगंगा जोडप्रकल्प योजनेवर प्रकाशझोत टाकणारी वृतमालिका आजपासून...
कृष्णा- माणगंगा जोडप्रकल्प - १
अविनाश बाड
आटपाडी
: आटपाडी तालुक्यासह माणगंगा नदीच्या खोऱ्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत क्वचित पाऊस पडतो. अलीकडे कृष्णा खोऱ्यात याच काळात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी असते. अनेकदा महापूर येतो आणि कृष्णाकाठच्या परिसराचे होत्याचे नव्हते होते. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील वाईजवळ धोमधरण आहे. तिथून माणगंगा नदीपर्यंत बोगदा काढून पाणी सोडण्याची योजना तांत्रिक दृष्ट्या मंजूर होऊन १२ वर्षे झाली, तरी ती प्रत्यक्षात आवतरली नाही. ही योजना झाली तर महापूर आणि दुष्काळ या संकटांवर एकच रामबाण उपाय निघणार आहे.
वाई (जि. सातारा) येथेही पुरामुळे हानी होते. यामुळे तिथल्या प्रकल्पाच्या डाव्या बाजूला कालवा काढून कृष्णामाई दुष्काळी भागात नेण्याचा प्रस्ताव या योजनेद्वारे आहे. तिथून ७६ कि.मी. अंतरावर नैसर्गिक उताराने आवश्यक तिथे बोगदा काढून पिंगळी (ता. माण जि. सातारा) येथे पाणी सोडायचे. पिंगळी नदीतून नैसर्गिक उताराने माणगंगा नदीत कृष्णामाई अवतरेल. माणगंगा नदी पुढे भीमा नदीला सरकोली (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) येथे मिळते. पुढे भीमा नदीचा
कुरवरपूरम (कर्नाटक) येथे कृष्णा नदीचा श्रीसंगम होतो.
कृष्णा नदीला मिळून हे पाणी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांनाच मिळते.
पाणी विभागून गेल्याने महापुराचे संकट टळते.
२००६ ते २००८ या कालावधीत उपग्रहाच्या मदतीने घेतलेली छायाचित्रे, टोपोशिट्स आणि प्रत्यक्ष त्या परिसरात जाऊन हा प्रकल्प तयार केला. हा प्रकल्प शासनाच्या जलसंपदा विभागाने पुन्हा सर्वेक्षण करून मंजूर केला. दि. २६ मार्च २००९ पासून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लालफितीत अडकून पडला आहे. त्यावेळी या प्रकल्पाचा ५७० कोटी एवढा खर्च अपेक्षित होता. आता त्यासाठी २१६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
कोट
दुष्काळी भागातील कोरड्या नद्यांचा वापर कालवा म्हणून करावा. हे पाणी पुढे कर्नाटकमध्ये कृष्णा नदीलाच जाऊन मिळते. त्यामुळे निसर्गाचे संवर्धन होऊन महापूर आणि दुष्काळावर मात करता येईल.
- दिनकर पवार, निवृत अभियंता, पाटबंधारे विभाग.
चौकट
कृष्णाकाठच्या पुत्राने मांडलेली योजना!
२००३ मध्ये आटपाडी परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा पाटबंधारे विभागाचे अभियंता
दिनकर पवार येथे होते. तलावात गाळ, पाणी राखण्यासाठी पोलीस संरक्षण आणि पाण्याविना लोकांचे होणारे हाल त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांची वडूज (जि. सातारा) येथे बदली झाली. तिथेही तीच अवस्था. त्यांचे मूळगाव पुणदी (ता. पलूस) २००५ मध्ये कृष्णेला गावी महापूर आला; मग त्यांचा अभ्यास सुरू झाला आणि या योजनेचा जन्म झाला.